तिरुप्पूर – तमिळनाडू (Tamil Nadu) राज्यातील तिरूप्पूरमध्ये लाखोंचा हुंडा देऊनही नवविवाहितेवर आत्महत्या (Suicide_ करण्याची वेळ आली. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर (Vaishnavi Hagavane suicide case) रिधन्या अण्णादुराई(२७ ) हिने सासरच्या छळाला कंटाळून आपले जीवन संपवले. त्यापूर्वी तिने वडिलांना सात ऑडिओ मेसेज पाठवले होते. त्यामध्ये आपल्याला जाच सहन होत नसल्याने आत्महत्या करत असल्याचे तिने म्हटले होते. याप्रकरणी पोलिसांनी पती, सासू – सासरे यांना अटक केली आहे.
रिधन्याचे वडील अण्णादुराई हे एका कपडे कंपनीचे मालक आहेत. कविनकुमार या तरुणाशी एप्रिल महिन्यात रिधन्याचा विवाह झाला होता. लग्नात कविनकुमारच्या कुटुंबाने ८० तोळे सोने आणि ७० लाख रुपयांची व्होल्वो कार हुंडा म्हणून घेतली होती. पण त्यानंतरही तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता. त्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले. काल मंदिरात जायचे सांगून रिधन्या ही गाडी घेऊन घराबाहेर पडली होती. घरापासून काही अंतरावर गेल्यावर तिने कीटकनाशक गोळ्या खाल्ल्या. तिची गाडी बराच वेळ एकाच जागेवर थांबल्याने स्थानिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तपास केल्यानंतर कारमध्ये रिधन्याचा मृतदेह आढळला. तिच्या तोंडाला फेस आला होता.
रिधन्याने वडिलांना पाठवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये (Audio Clip) म्हटले होते की, कविन आणि त्याच्या आई-वडिलांनी मला या लग्नात अडकविण्याचे षडयंत्र रचले होते. मी रोज त्यांचा मानसिक त्रास सहन करू शकत नाही. याविषयी कुणाशी बोलावे, हे मला माहिती नाही. मी सांभाळून घ्यावे असे काही लोकांना वाटते. आयुष्य असेच असते असे ते सांगतात. पण माझा ते त्रास सहन करू शकत नाहीत. मी खोटे बोलते असे तुम्हालाही वाटत असेल. पण तसे नाही. मी आयुष्यभर तुमच्यावर ओझे बनून राहणार नाही. यावेळी मी कोणतीही चूक केलेली नाही. मला असे जगणे पसंत नाही. ते मला खूप मानसिक त्रास देतात. कविन मला शारीरिक त्रास देतो. मी माझे आयुष्य आता जगू शकत नाही. तुम्ही आणि आई माझे जग आहात. शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही माझ्यासाठी आशेचा किरण होता. पण मी तुम्हाला खूप दु:ख दिले. तुम्ही मला या अवस्थेत पाहू शकत नाही. मला माफ करा. सगळे संपले आहे. मी जात आहे.