Kanimozhi Karunanidhi on National Language | पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) च्या माध्यमातून ठोस कारवाई केली आहे. त्यानंतर केंद्र सरकारने या कारवाईबाबत जागतिक स्तरावर देशाची भूमिका मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ (all-party delegation) विविध देशांमध्ये पाठवले आहे. नुकतेच,डीएमकेच्या खासदार कनिमोझी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ स्पेनला पोहोचले.
स्पेनमध्ये आयोजित कार्यक्रमात, डीएमकेच्या खासदार कनिमोझी करुणानिधी (Kanimozhi Karunanidhi) यांनी भारताच्या राष्ट्रभाषेबाबत महत्त्वाचे विधान केले.
माद्रिदमध्ये कनिमोझी यांना भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर त्यांनी दिलेले उत्तर चर्चेत आले आहे. भारतीय डायस्पोराच्या सदस्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कनिमोझी म्हणाल्या, “भारताची राष्ट्रभाषा म्हणजे एकता आणि विविधता. हाच संदेश आमचे शिष्टमंडळ जगाला देत आहे आणि आजच्या घडीला हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.”
#WATCH | Madrid, Spain: While addressing the Indian diaspora, DMK MP Kanimozhi said, "The national language of India is unity and diversity. That is the message this delegation brings to the world, and that is the most important thing today…" pic.twitter.com/cVBrA99WK3
— ANI (@ANI) June 2, 2025
भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील त्रि-भाषा सूत्रावरून देशात वाद सुरू असतानाच हे वक्तव्य आले आहे. याच चर्चेदरम्यान दहशतवादाच्या मुद्द्यावर भाष्य करताना कनिमोझी म्हणाल्या, “भारत एक सुरक्षित देश आहे. आपल्या लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातो, पण आम्ही दहशतवादाचा सामना करू. काश्मीर (Kashmir) सुरक्षित राहील याची आम्ही खात्री करू.”
कनिमोझी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा पाच देशांचा दौरा स्पेन हा शेवटचा टप्पा आहे, त्यानंतर हे शिष्टमंडळ भारतात परतणार आहे. या गटात समाजवादी पक्षाचे खासदार राजीव कुमार राय, भाजपचे ब्रिजेश चौटा, आपचे अशोक मित्तल, आरजेडीचे प्रेम चंद गुप्ता आणि माजी मुत्सद्दी मनजीव सिंग पुरी यांचा समावेश आहे.