‘काही देश दहशतवादाचा धोरण म्हणून वापर करतात’, राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच पाकिस्तानला झापले

Rajnath Singh in SCO meet

Rajnath Singh in SCO meet | भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे सध्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) बैठकीसाठी चीनमध्ये आहे. संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेसमोरील आव्हानांवर ठाम भूमिका मांडली.

यावेळी त्यांनी कोणत्याही देशाचे नाव न घेता, सीमापार दहशतवादावर (Cross-Border Terrorism) भारताची चिंता व्यक्त केली आणि SCO सदस्य देशांना याविरोधात ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले. तसेच, दहशतवादावरून अप्रत्यक्षपणे पाकिस्तानवर निशाणा साधला.

राजनाथ सिंह म्हणाले, “काही देश सीमापार दहशतवादाला आपल्या धोरणाचे साधन बनवतात आणि दहशतवाद्यांना आश्रय देतात. अशा दुहेरी भूमिकेला कोणतीही जागा नसावी. SCO ने अशा राष्ट्रांवर टीका करण्यास अजिबात संकोच करू नये.”, अशा शब्दात त्यांनी चीनसमोरच पाकिस्तानवर हल्ला चढवला.

पहलगाम हल्ल्याचा उल्लेख, पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीका

राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा थेट उल्लेख केला. या हल्ल्यात एका नेपाळी नागरिकासह 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. संयुक्त राष्ट्र-नियुक्त दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) ची सहयोगी संघटना ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF – The Resistance Front) ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.

सिंह म्हणाले, “पहलगाम येथील हल्ल्यात 26 निष्पाप लोकांना त्यांच्या धार्मिक ओळखीवरून लक्ष्य करून मारण्यात आले. हा हल्ला ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी गटाने केला, जो लष्कर-ए-तैयबाचा प्रॉक्सी आहे. दहशतवादाचे कोणतेही कृत्य अन्यायकारक आणि अपराधिक आहे. अशा कृत्यांना, त्यांचे आयोजन करणाऱ्यांना आणि त्यांना आर्थिक मदत करणाऱ्यांना जबाबदार ठरवून न्याय मिळवणे आवश्यक आहे.”

SCO बैठकीत भारताची ठाम भूमिका

दरम्यान, चीनच्या किंगदाओ शहरात आयोजित SCO संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इराण आणि नवीन सदस्य बेलारूस या दहा पूर्ण सदस्य राष्ट्रांचे संरक्षण मंत्री सहभागी झाले.

राजनाथ सिंह यांनी ‘सुधारित बहुपक्षवाद’ यावर जोर देत सांगितले, “कोणताही देश, कितीही शक्तिशाली असला तरी, एकटा सर्व आव्हाने हाताळू शकत नाही. संवाद आणि सहकार्य हाच संघर्ष टाळण्याचा मार्ग आहे.” राजनाथ सिंह यांनी SCO बैठकीत पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करून पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. त्यांनी दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशांवर कठोर कारवाईची गरज व्यक्त केली.

सिंह यांनी दहशतवादाविरोधात ठोस कारवाईसाठी SCO सदस्य देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांनी विश्वासाचा अभाव () हा प्रादेशिक शांततेसमोरील सर्वात मोठा अडथळा असल्याचेही नमूद केले.