Revanth Reddy on Modi Gov | तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांनी अलीकडील भारत-पाकिस्तान संघर्षात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत गंभीर टीका केली आहे. त्यांनी भाजपवर युद्धाचा वापर राजकीय हत्यार म्हणून केल्याचा आरोप केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पारदर्शकतेचा अभाव असल्याचे म्हटले आहे.
राहुल गांधी पंतप्रधान असते, तर त्यांनी पाकव्याप्त काश्मीर परत आणले असते, असे वक्तव्य देखील रेवंत रेड्डी यांनी केले आहे.
जय हिंद यात्रेदरम्यान झालेल्या सभेत बोलताना रेड्डी म्हणाले, “देश शोक व्यक्त करत असताना भाजप मात्र युद्धाच्या माध्यमातून राजकारण करत आहे. चार दिवसांच्या युद्धानंतर काय झाले? कोण जिंकला? कोण हरला? हे अद्याप स्पष्ट नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदी घोषित केली, भारताने नाही.”
युद्धापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावली असताना, युद्धबंदीच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक न बोलावल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली. “जेव्हा तुमची गरज होती तेव्हा तुम्ही आम्हाला बोलावले. आम्ही लष्करासोबत उभे राहिलो. पण जेव्हा तुम्ही युद्ध संपवले तेव्हा तुम्ही आम्हाला सामील करून घेतले नाही,” असे ते म्हणाले.
राष्ट्रीय सुरक्षेवरून भाजपला धारेवर धरत त्यांनी विचारले, “पाकिस्तानने राफेलची (Rafale jets) किती विमाने पाडली? कोणी सांगणार?” तसेच, सरकार PoK परत मिळवण्यात अपयशी ठरल्याचे ते म्हणाले.
रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींची तुलना इंदिरा गांधी यांच्याशी करत, 1971 च्या युद्धात त्यांनी दाखवलेल्या नेतृत्त्वाचे कौतुक केले. “त्या काळी अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने होती, पण इंदिरा गांधी खंबीरपणे उभ्या राहिल्या. आता मात्र चीन 4,000 चौरस किमी जमीन काबीज करतो आणि आपल्या जवानाचा बळी घेतो, तरीही पंतप्रधान शांत बसतात,” अशी टीका त्यांनी केली.
रेड्डी पुढे म्हणाले, “जर राहुल गांधी पंतप्रधान असते, तर त्यांनी PoK परत मिळवले असते. मोदी हे जणू बंदी घातलेल्या 1000 रुपयांच्या वापरात नसलेले आणि मूल्यहीन नोटेसारखे आहेत, अशी जोरदार टीका त्यांनी केली.