राहुल गांधींच्या ‘नरेंदर सरेंडर’ विधानावर शशी थरूर असहमत! अमेरिकेत बोलताना म्हणाले….

Shashi Tharoor

Shashi Tharoor | ‘ऑपरेशन सिंदूर’च्या (Operation Sindoor) पार्श्वभूमीवर शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. यावेळा बोलताना शशी थरूर यांनी राहुल गांधींच्या ‘नरेदर सरेंडर’ विधानावर भाष्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या ‘नरेंद्र सरेंडर’ या टिकेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, एका महिला पत्रकाराने काँग्रेस नेते शशी थरूर यांना थेट प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना थरूर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भारत-पाकिस्तान संघर्षात कोणत्याही टप्प्यावर तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप नव्हता आणि मध्यस्थीची गरज भासलेली नाही.

महिला पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना थरूर म्हणाले, “काँग्रेस पक्ष अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा आदर करतो. मात्र, भारताने या संघर्षात कोणतीही मध्यस्थी मागितलेली नाही. भारताची भूमिका स्पष्ट आहे की हा मुद्दा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आहे, कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाची गरज नाही.”

अमेरिकेत ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) संदर्भात भारताच्या भूमिकेचे स्पष्टीकरण देताना थरूर म्हणाले, “जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाची भाषा वापरेल, तोपर्यंत भारतही बळाचा वापर करणार. भारत अशा प्रसंगी कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीवर अवलंबून राहणार नाही.”

वॉशिंग्टन, डी.सी.मध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधताना थरूर यांनी सांगितले की, “या सर्वपक्षीय शिष्टमंडळात पाच राजकीय पक्षांचे , सात राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे सात खासदार आणि दोन राजदूत सहभागी आहेत. यामध्ये सध्याचे आणि माजी दोन्ही राजदूत सहभागी झाले आहेत. या शिष्टमंडळात आठ राज्यांचे आणि तीन धर्मांचे प्रतिनिधित्व आहे.”

दरम्यान, मध्य प्रदेशात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत नरेंदर सरेंडर असा उल्लेख केला होता. तसेच, त्यांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणावर आणि पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.