‘देश प्रथम, पक्ष नंतर’: शशी थरूर यांचा काँग्रेसला संदेश; जवाहरलाल नेहरूंच्या ‘त्या’ विधानाचा उल्लेख करत दिले उत्तर

Shashi Tharoor

Shashi Tharoor | गेल्याकाही महिन्यांपासून खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) आणि काँग्रेस (Congress) पक्षामध्ये आलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर शशी थरूर यांनी वारंवार मोदी सरकारचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ते भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. आता त्यांनी त्यांच्या काँग्रेस निष्ठेवर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यासाठी देश प्रथम आणि पक्ष नंतर आहे, असे ते म्हणाले.

देशाचे हित नेहमीच पक्षहितापेक्षा वर असले पाहिजे. भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विधानाचा उल्लेख करत थरूर म्हणाले, “जर भारत नसेल, तर कोण जगेल?” राजकीय स्पर्धेवर राष्ट्रीय एकतेला प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. कोचीमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी यावर भाष्य केले.

‘देश संकटात असताना मतभेद बाजूला ठेवा’

तिरुवनंतपुरमचे खासदार असलेले शशी थरूर म्हणाले, “पक्ष हे केवळ देशाची सेवा करण्याचे साधन असतात. तुमचा पक्ष कोणताही असो, उद्दिष्ट एकच पाहिजे, तो म्हणजे अधिक चांगला आणि सुरक्षित भारत निर्माण करणे.” थरूर यांनी स्पष्ट केले की, त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या बाजूने भूमिका घेतली, ती केवळ देशाच्या एकतेसाठी होती, परंतु त्यांच्या पक्षातील काही जणांना ही भूमिका रुचली नाही.

गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी थरूर यांना अप्रत्यक्ष टोला लगावत म्हटले होते की, “काँग्रेस देश प्रथम मानते, परंतु काहींसाठी मोदी प्रथम आणि देश नंतर” अशी वृत्ती आहे.

यावर प्रतिक्रिया देताना थरूर म्हणाले, “मी कोणत्याही पक्षाविरोधात नाही, पण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने देशासाठी जे योग्य आहे, तेच करणार.”

“राजकारण हे… स्पर्धेबद्दल आहे. जेव्हा माझ्यासारखे लोक म्हणतात की आम्ही आमच्या पक्षांचा आदर करतो. परंतु राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी आम्हाला इतर पक्षांशी सहकार्यकरण्याची गरज आहे, तेव्हा काहीवेळा पक्षांना हे ‘अविश्वासू’ (disloyal) वाटते. ही एक मोठी समस्या बनते.”, असेही ते म्हणाले.