Shashi Tharoor on Operation Sindoor | पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकस्थित दहशतवादी तळांना उद्धवस्त केले होते. यानंतर ऑपरेशन सिंदूरबाबत जगाला माहिती देण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळे विविध देशांचा दौरा करत आहेत. अमेरिका दौऱ्यावर असलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ नावामागचे कारण सांगितले.
या कारवाईला त्यांनी एक “अत्यंत हुशारीने निवडलेले नाव” असे संबोधले आहे. भारताने दहशतवादाविरोधातील आपली ठाम भूमिका जागतिक स्तरावर अधोरेखित करण्यासाठी सुरू केलेल्या मुत्सद्दी कार्यक्रमाचा हा एक भाग आहे.
अमेरिकेत झालेल्या कार्यक्रमात बोलताना थरूर ऑपरेशन सिंदूर या नावाचे महत्त्व आधोरेखित केले. ते म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर हे नाव निवडताना एका सांस्कृतिक प्रतिकाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. सिंदूर हा हिंदू स्त्रियांच्या विवाह सोहळ्याशी संबंधित एक परंपरागत शेंदरी रंग आहे. तो हिंदू परंपरेत विवाहित महिलांच्या कपाळावर लावला जातो.”
थरूर म्हणाले, “त्या दहशतवाद्यांनी स्त्रियांना सोडून पुरुषांना त्यांच्याच बायका-मुलांसमोर गोळ्या घातल्या. एका महिलेने ‘मलाही ठार करा’ असे सांगितले असता तिला उत्तर मिळाले ‘परत जा आणि आम्ही काय केले ते सर्वांना सांग.’ हे त्या क्रौर्याचे प्रतिबिंब आहे.”
थरूर पुढे म्हणाले, “ही कारवाई केवळ लष्करी नव्हे, तर भावनिकही होती. २६ महिलांच्या कपाळावरील सिंदूर पुसण्याचा सूड घेण्यासाठीच ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले गेले. यातून ‘खून का बदला खून’ या हिंदी अभिव्यक्तीचा संदर्भ घेत ‘सिंदूर का बदला खून’ असा भावनिक संदेश दिला गेला.”
या कोडनेम कारवाईचे उद्दिष्ट बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदआणि मुरीदकेतील लष्कर-ए-तैयबा च्या प्रमुख दहशतवाद्यांना लक्ष्य करणे हे होते. थरूर यांच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई पहलगाम हल्ल्यात विधवा झालेल्या महिलांसाठी भारताचे ठोस प्रत्युत्तर होते.
दरम्यान, या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांच्यासह शंभवी चौधरी, सरफराज अहमद, जी.एम. हरिश बालयोगी, शशांक मणी त्रिपाठी, तेजस्वी सूर्या, भुवनेश्वर कलिता, मल्लिकार्जुन देवडा, माजी राजदूत तरणजीत सिंग संधू आणि खासदार मिलिंद देवरा यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळाने विविध देशांचा दौरा करत ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडली.