Trump Praises India-Pakistan Ceasefire | 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या (Pahalgam Terror Attack) पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या संघर्षानंतर अखेर भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) यांच्यात शस्त्रसंधी लागू झाली आहे. या शस्त्रसंधीसाठी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दोन्ही देशांचे कौतुक करत त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. याआधी देखील ट्रम्प यांनीच सर्वातआधी स्वतः शस्त्रसंधी लागू झाल्याची घोषणा केली होती.
काश्मीरवर तोडगा काढण्याचा ट्रम्पचा इशारा
ट्रुथ सोशल (Truth Social) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना ट्रम्प यांनी म्हटले की, “भारत आणि पाकिस्तानच्या मजबूत आणि खंबीर नेतृत्वाचा मला खूप अभिमान आहे, कारण त्यांनी अत्यंत शहाणपण, दूरदृष्टी आणि धैर्य दाखवून हे पूर्णपणे ओळखले की, आता सुरू असलेल्या आक्रमकतेला थांबवण्याची वेळ आली आहे – ज्यामुळे प्रचंड मृत्यू आणि विध्वंस होऊ शकला असता. लाखो चांगले आणि निरपराध लोक मृत्यूमुखी पडू शकले असते! तुमच्या धाडसी कृतीमुळे तुमची प्रतिष्ठा अधिकच उजळली आहे.
या ऐतिहासिक आणि वीर निर्णयापर्यंत तुम्हाला पोहोचण्यात अमेरिका मदतीला आली, याचा मला अभिमान आहे. जरी यावर चर्चा झाली नव्हती, तरी मी या दोन्ही महान राष्ट्रांसोबत व्यापार मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे. याशिवाय, हजार वर्षांनंतर’ का होईना, काश्मीर संदर्भात तोडगा काढता येतो का हे पाहण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करेन., असेही ट्रम्प म्हणाले.
त्याआधी ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्येसांगितले होते की, अमेरिका-मध्यस्थी चर्चेनंतर दोन्ही देशांनी परस्पर लष्करी कारवाया थांबवण्यास सहमती दर्शवली. मात्र, भारतीय परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले की, ही शस्त्रबंदी पाकिस्तानसोबत थेट चर्चेअंती झालेली आहे.
शस्त्रसंधी नंतरही पाकिस्तानकडून उल्लंघन
भारत आणि पाकिस्तानने जमिनीवरील, हवेतून आणि समुद्रातून होणारे सर्व लष्करी हल्ले थांबवण्याचे मान्य केले. परंतु काही तासांतच पाकिस्तानकडून या शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय शहरांवर ड्रोन हल्ले करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री (Vikram Misri) यांनी पाकिस्तानला इशारा देत म्हटले की, “ही समज गंभीरतेने घ्यावी लागेल. शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर सुरू झालेले उल्लंघन चिंताजनक आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, भारतीय सशस्त्र दलांनी या उल्लंघनांना “योग्य आणि कठोर उत्तर” दिले आहे.
दरम्यान 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये बहुतांश पर्यटक होते. त्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) 9 दहशतवादी तळांवर लक्ष केंद्रीत करत मोठी कारवाई केली. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचा आणि ड्रोनचा वापर करून भारताच्या सीमावर्ती भागांवर हल्ले करण्यात आले, मात्र भारतीय सैन्याने हे हल्ले यशस्वीपणे परतवून लावले.