गेल्याकाही दिवसात भारतातील विविध शहरातून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नागरिकांना अटक करण्यात आली आहे. ठाण्यातून देखील एका इंजिनिअरला पाकसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे.
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (Maharashtra Anti-Terrorism Squad) 27 वर्षीय अभियंता रवींद्र मुरलीधर वर्मा (Ravindra Murlidhar Verma) याला अटक केली आहे. त्याच्यावर पाकिस्तानी गुप्तहेराला संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप आहे. ही माहिती त्याने एका महिलाच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंटद्वारे सुरु झालेल्या ‘हनीट्रॅप’ प्रकरणात दिल्याचा संशय आहे.
एटीएसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वर्मा हा ठाण्याच्या कळवा परिसरातील रहिवासी असून एका खासगी संरक्षण तंत्रज्ञान कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होता. या नोकरीमुळे त्याला दक्षिण मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये प्रवेश मिळत होता, आणि तो नौदलाच्या युद्धनौकांवर देखील काम करत होता.
फेसबुकवरून झाली सुरुवात
नोव्हेंबर 2024 पासून वर्मा एका पाकिस्तानी गुप्तहेराच्या संपर्कात होता. त्याला ‘पायल शर्मा’ आणि ‘इस्प्रीत’ या महिलांच्या खोट्या नावाने फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. सुरुवातीला भारतातीलच असल्याचा भास देत युद्धनौकांवरील माहिती हवी असल्याचं कारण दिलं. त्यानंतर काही दिवसात त्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून संवेदनशील माहिती मागवली गेली.
नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीत वर्माने व्हॉट्सॲप (WhatsApp) वरून नौदलाच्या युद्धनौका आणि पाणबुडींबाबतची महत्त्वाची माहिती, रेखाचित्रे, आकृत्या आणि ऑडिओ नोट्सच्या स्वरूपात पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हला पाठवली. याच्या बदल्यात त्याला भारत आणि परदेशातील बँक खात्यांमधून पैसे मिळाले.
अधिकाऱ्यांच्या मते, “वर्माला पूर्ण कल्पना होती की तो कोणाला माहिती देतोय आणि काय माहिती देतोय. त्याने हेतुपुरस्सर जाणीवपूर्वक जासूसी केली.”
पाकिस्तानी एजंटला माहिती कशी पुरवली?
अधिकाऱ्यांनी सांगितले की, वर्मा एका संरक्षण तंत्रज्ञान कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करत होता आणि त्याच्या कामामुळे त्याला दक्षिण मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये प्रवेश मिळत होता. “तो नौदलाची जहाजे आणि पाणबुड्यांवरही जात असे,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
“नौदल डॉकयार्डला भेटीदरम्यान त्याला आतमध्ये मोबाईल फोन (mobile phone) घेऊन जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे, तेथील काम संपल्यानंतर तो युद्धनौका आणि पाणबुड्यांसंबंधी संवेदनशील माहिती रेखाचित्रे किंवा आकृत्या काढून शेअर करत असे. कधीकधी तो ऑडिओ नोट्सच्या माध्यमातूनही माहिती देत असे,” असे अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले.
अधिकाऱ्यांनी सांगितले, “एटीएसला संशय आहे की त्याने पाणबुड्या आणि युद्धनौकांची नावेही पाकिस्तानी एजंटला पुरवली आहेत.”
गुन्हा दाखल आणि पुढील तपास
वर्मा आणि त्याच्या संपर्कात असलेल्या आणखी दोन जणांविरुद्ध अधिकृत गोपनीयता कायदा कलम 3 आणि भारतीय न्याय संहिता कलम 61(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीटीआीनुसार, एटीएसने गुप्त माहितीनुसार कारवाई करत बुधवारी त्याला ताब्यात घेतले. गुरुवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला सोमवारपर्यंत एटीएस कोठडीत ठेवण्यात आलं आहे.
एटीएस सध्या वर्माचा मोबाईल फोन, सोशल मीडियावरील संवाद आणि इतर उपकरणांची तपासणी करत आहे. त्याने युद्धनौका आणि पाणबुडींची नावेही पाकिस्तानी एजंटला पुरवली असल्याचा संशय आहे. प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.