बंगळुरु- 18 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर आरसीबी संघाने काल आयपीएल ट्रॉफी जिंकली. त्यानंतर कर्नाटकच्या सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्या काँग्रेस सरकारने अत्यंत घाईने संघाचा विजयी सोहळा चेन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित केला. तिथे लाखो क्रिकेट चाहते येणार याची जाणीव असून, केवळ पाच हजार पोलीस तैनात केले आणि ज्याची भीती होती तीच दुर्घटना घडली. सोहळा पाहण्यासाठी स्टेडियममध्ये शिरण्याच्या प्रयत्नात प्रचंड चेंगराचेंगरी झाली. त्यात 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दहा जण रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहेत आणि 33 जखमी व्यदेही व बाऊरिंग रुग्णालयात उपचार घेत आहेत. संताप आणणारी बाब म्हणजे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना ही दुर्घटना आणि मृत्यू झाले हे माहीत असूनही त्यांनी स्टेडियमवरील सोहळा सुरू ठेवला.
काल मध्यरात्री अहमदाबाद येथे अंतिम सामना झाल्यानंतर कर्नाटक सरकारने रात्रीत विजयी सोहळ्याचे आयोजन केले. मात्र इतका मोठा सोहळा ठरवताना क्रिकेटच्या चाहत्यांच्या सुरक्षेचा जराही विचार केला नाही. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सोहळा पाहण्यासाठी ऑनलाईन पास देणे सुरू केले, पण सर्व्हर डाऊन झाला. त्यामुळे हजारो चाहते थेट स्टेडियमवर पोहोचले आणि सायंकाळपर्यंत गर्दी हाताबाहेर जाऊ लागली.
तिकडे मुख्यमंत्री सिद्धरम्मया आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी या सर्व त्रुटींकडे पूर्ण दुर्लक्ष करीत क्रिकेटपटूंचे विमानतळावर स्वागत केले. मग त्यांना विधान भवनात आणून तिथे सत्कार केला आणि तिथून स्टेडियमवर नेले. स्टेडियमवर सोहळा सुरू होता. मात्र स्टेडियमच्या बंद गेटवर चाहत्यांची गर्दी उसळली होती. सर्वजण आत जाण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांना गर्दी आवरता येत नव्हती. त्यातच चेंगराचेंगरी झाली. स्टेडियमच्या गेट क्रमांक 3, 10, 11, 18 च्या बाहेर हाहाःकार उडाला होता. लोक एकमेकांना तुडवत, ढकलत होते. यात 11 चाहत्यांचा प्राण गेला. त्यात 6 पुरुष, 4 महिला आणि एक लहान मुलगी होती. 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. 33 जण जखमी झाले. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना ही परिस्थिती माहीत होती तरीही त्यांनी सोहळा रद्द केला नाही. किंबहुना पूर्ण सोहळा पार पडला.
डी. के. शिवकुमार यांना याबाबत विचारले तेव्हा धक्कादायक विधान केले की, आम्ही आणखी कोणती सुरक्षा देऊ शकत होतो. चाहत्यांनी त्यांचा आनंद शिस्तीत साजरा करायला हवा होता. मुख्यमंत्री सिद्धरम्मया, क्रिकेटपटू आणि स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षक यांना बाहेर काय चालले आहे याची माहितीच नव्हती. मुख्यमंत्री आणि क्रिकेटपटूंपर्यंत माहिती पोहोचू दिली नाही किंवा माहिती असूनही त्यांनी सोहळा सुरू ठेवला. या भयंकर दुर्घटनेनंतर भाजपाने शिवकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. इतका प्रकार घडल्यावर शिवकुमार यांनी फक्त खुल्या बसमधून क्रिकेटपटूंची मिरवणूक निघणार होती तेवढी रद्द केली.
घटना अत्यंत हृदयद्रावक मोदींकडून दुःख व्यक्त
या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करुन दुःख व्यक्त केले.या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, बंगळुरूमधील दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक आहे.या घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत.जखमींना लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो.
मृतांच्या नातेवाईकांना मदत करणार – राजीव शुक्ला
या घटनेवरुन बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, ही अचानक झालेली दुर्घटना आहे आणि सर्वांनाच दुःख आहे.आम्ही मृत आणि जखमींना शक्य तितकी मदत करणार आहोत. आम्ही कर्नाटक सरकारशीही बोलत आहोत. यासोबतच आयपीएल फ्रँचायझीशीही चर्चा सुरू आहे. हा राजकारणाचा विषय नाही.
मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत
ही घटना घडल्यानंतर सिद्धरामय्या म्हणाले की, विधानभवनाबाहेर 1 लाख लोक जमले होते आणि त्यासोबत स्टेडियमची क्षमता 35 हजार लोकांची आहे, मात्र स्टेडियमच्या आत आणि बाहेर 2 लाख लोक आली होती. आम्ही विचार केला त्यापेक्षा अधिक लोक विजयी मिरवणूक पाहण्यासाठी आले. त्यातूनच ही दुर्घटना घडली. मी मृतांच्या नातेवाईकांसाठी संवेदना व्यक्त करतो. आमचे सरकार मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत करणार आहे. जखमींवर मोफत उपचार मिळणार आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
