IND vs ENG Test: 5 शतकं ठोकली, पण तरीही इंग्लंडकडून भारताचा पराभव, 148 वर्षांत क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडला ‘हा’ नकोसा विक्रम

England India Test Series

England India Test Series | हेडिंग्ले येथे खेळल्या गेलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा 5 गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात भारताने एक अनोखा, पण नकोसा विक्रम नोंदवला. कसोटी इतिहासात पाच फलंदाजांनी शतके झळकावूनही सामना गमावणारा भारत हा पहिलाच संघ ठरला आहे. क्रिकेटच्या 148 वर्षात एखाद्या संघाने 5 शतकं ठोकूनही पराभव होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारताचा नकोसा विक्रम

यापूर्वी, 1928-29 च्या ॲशेस कसोटीत मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध चार शतके करूनही सामना गमावला होता. भारताने आता या विक्रमाला मागे टाकून एका डावात पाच शतके करूनही पराभव स्वीकारण्याचा नकोसा विक्रम केला आहे.

एका कसोटी सामन्यात पराभूत झालेल्या संघांनी केलेल्या एकूण धावांमध्ये, 2025 च्या हेडिंग्ले कसोटीतील भारताच्या 835 धावा आता चौथ्या-सर्वाधिक एकूण धावा ठरल्या आहेत. या यादीत इंग्लंडचा संघ अव्वल स्थानी आहे, ज्यांनी 1948 मध्ये हेडिंग्ले येथेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध 861 धावा करूनही सामना गमावला होता. यानंतर 2022 मध्ये रावळपिंडी येथे पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध केलेल्या 847 धावा आणि 2022 मध्ये ट्रेंट ब्रिज येथे न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध केलेल्या 837 धावा यांचा क्रमांक लागतो.

इंग्लंडचा ऐतिहासिक पाठलाग आणि विक्रमी विजय

दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात 371 धावांच्या विजयासाठी आवश्यक लक्ष्याचा पाठलाग करताना, इंग्लंडने पाचव्या आणि अंतिम दिवशी बिनबाद 21 धावांपासून सुरुवात केली. पहिल्या सत्रात कोणताही गडी न गमावता त्यांनी चांगली फलंदाजी केली. दुसऱ्या सत्रात भारताने चार विकेट्स घेत जोरदार पुनरागमन केले असले तरी, इंग्लंडने लक्ष्याचा पाठलाग कायम ठेवला. अखेरीस, यजमान इंग्लंडने 82 षटकांत 5 गडी गमावून 373 धावा करत विजय साकारला.

हेडिंग्ले येथे चौथ्या डावात 371 धावांचा यशस्वी पाठलाग करणे हे कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या रन चेसपैकी एक ठरले आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडने केलेला हा दुसरा-सर्वाधिक यशस्वी पाठलाग आहे. याआधी त्यांचा सर्वोच्च पाठलाग 2022 मध्ये एडबॅस्टन येथे भारताविरुद्धच 378 धावांचा होता, जिथे जॉनी बेअरस्टो आणि जो रूटने मॅच-विनिंग खेळी खेळली होती. कसोटी इतिहासात भारताविरुद्ध यशस्वीपणे पाठलाग करण्यात आलेला हा दुसरा-सर्वाधिक धावांचा पाठलाग ठरला आहे.

दरम्यान, या विजयानंतर, पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरी कसोटी 2 ते 6 जुलै दरम्यान बर्मिंगहॅम येथे खेळली जाईल.