कोहली, रोहितनंतर बुमराहही निवृत्ती घेणार? म्हणाला, ‘ज्या दिवशी…’

Jasprit Bumrah

Jasprit Bumrah | भारतीय क्रिकेट संघात गेल्याकाही दिवसात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. याशिवाय, कसोटीमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. त्यातच आता भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने निवृत्तीविषयी भाष्य केले आहे.

31 वर्षीय बुमराह सध्या भारतीय गोलंदाजीचा आधारस्तंभ मानला जातो. मात्र त्याच्या वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे त्याचे भविष्यातील क्रिकेट कारकिर्दीबाबत प्रश्न उपस्थित होतो आहे. दुखापतीमुळेच कसोटीचे कर्णधारपद बुमराहऐवजी गिलला देण्यात आल्याचे सांगितले जाते. नुकतेच, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याच्यासोबतच्या एका पॉडकास्टमध्ये बुमराहने आपल्या निवृत्तीच्या शक्यतेवर, मानसिकतेवर आणि कुटुंबाच्या प्राधान्यक्रमावर भाष्य केले.

मायकल क्लार्क सोबत बोलताना बुमराह म्हणाला की, “मी हा खेळ खूप प्रेमाने खेळतो. ऑस्ट्रेलियात असताना अनेक तरुण माझ्या बॉलिंगची नक्कल करताना दिसले. मीही पूर्वी तसेच करत होतो. हा प्रवास कायमचा नसेल, पण तो संपल्यानंतर मला या खेळासाठी काहीतरी परत द्यायचं आहे.” त्याने नमूद केले की, सतत क्रिकेट खेळण्यामागची किंमत त्याला चांगलीच ठाऊक आहे.

टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेत 32 विकेट्स घेतल्या होत्या, परंतु नंतर झालेल्या पाठदुखीच्या त्रासामुळे तो ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून बाहेर राहिला.

तो पुढे सांगतो, “तुम्हाला तुमच्या शरीराचा वापर कसा करायचा हे ठरवताना स्मार्ट व्हावं लागतं. मी आकडेवारीच्या मागे लागत नाही. ज्या दिवशी मला वाटेल की आता जोश राहिला नाही, शरीर साथ देत नाही, तेव्हा मी स्वतःहून निवृत्तीचा निर्णय घेईन.”

या संवादात बुमराहने वर्कलोड आणि कुटुंब या दोन गोष्टींवर विशेष भर दिला. बुमराह म्हणाला की, “माझ्यासाठी कुटुंब सर्वांत महत्त्वाचं आहे. खेळ महत्त्वाचा आहे, पण कुटुंब हे शेवटपर्यंत असतं. त्यामुळे माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये कुटुंबाला अग्रक्रम असतो.”