India England Test Series | भारत आणि इंग्लंड यांच्यातील आगामी पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) कसोटी मालिकेला ‘पतौडी ट्रॉफी’ऐवजी ‘अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी’ नाव देण्याचा प्रस्ताव मांडला होता.
पतौडी यांचे नाव हटवून ‘अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी’ नाव देण्यावरून वाद निर्माण झाला होता. मात्र, आता स्वतः सचिन तेंडुलकरने पुढाकार घेत हे नाव कायम ठेवावी अशी विनंती केल्याचे सांगितले जात आहे. सचिनच्या विनंतीमुळे मन्सूर अली खान पतौडी यांचा वारसा कायम राहणार आहे.
सचिन तेंडुलकरचा पुढाकार
रिपोर्टनुसार, सचिन तेंडुलकर यांनी पतौडी ट्रॉफीचे नाव कायम ठेवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि ECB सोबत वैयक्तिकरित्या चर्चा केली. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि ECB ने आपल्या निर्णयाचा फेरविचार केला. बीसीसीआयचे माजी सचिव आणि सध्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष जय शाह यांनीही या चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते.
मन्सूर अली खान पतौडी यांच्या स्मरणार्थ मालिकेच्या विजेत्या कर्णधाराला एक विशेष पदक देण्याचा प्रस्ताव आहे. या निर्णयामुळे भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील पतौडीचा वारसा जपला जाईल आणि त्यांचा सन्मानही होईल.
पतौडी ट्रॉफीच्या नावाबाबत नव्या घोषणेचा समारंभ अहमदाबाद विमान अपघातातील बळींच्या स्मरणार्थ पुढे ढकलण्यात आला आहे. “भारतातील दुःखद घटनेमुळे घोषणेसाठी योग्य वेळ ठरवली जात आहे,” असे ECB च्या एका अधिकाऱ्याने सांगितले. BCCI आणि ECB लवकरच नवीन तारीख निश्चित करतील.
पतौडी ट्रॉफी ही भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचे प्रतीक आहे, जी मन्सूर अली खान पतौडी यांच्या क्रिकेटमधील योगदानाची आठवण करून देते. सचिन तेंडुलकरच्या हस्तक्षेपामुळे या ट्रॉफीचे नाव कायम राहणार आहे.
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिली कसोटी: 20-24 जून, हेडिंग्ले, लीड्स
- दुसरी कसोटी: 2-6 जुलै, एजबास्टन, बर्मिंगहॅम
- तिसरी कसोटी: 10-14 जुलै, लॉर्ड्स, लंडन
- चौथी कसोटी: 23-27 जुलै, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
- पाचवी कसोटी: 31 जुलै-4 ऑगस्ट, द ओव्हल, लंडन