RCB Victory Parade Stampede | रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या (Royal Challengers Bengaluru) आयपीएल 2025 विजयाच्या जल्लोषाला गालबोट लागले आहे. आरसीबीच्या विजयानंतर बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला असून, 47 जण जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेबाबत आता विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या घटनेबद्दल विराटने मोजक्या शब्दातच भावना व्यक्त केल्या. त्याने सोशल मीडियावर लिहिले की, “निःशब्द आहे, अत्यंत व्यथित आहे.” त्याने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये घटनेबद्दलचे संघाचे अधिकृत निवेदन शेअर केले.
दक्षिण आफ्रिका आणि आरसीबीचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने देखील या घटनेबद्दल भावना व्यक्त केल्या. त्याने ‘X’ अकाउंटवर लिहिले की, “माझ्या प्रार्थना चेंगराचेंगरीत पीडित झालेल्या सर्वांसोबत आहेत.”
35,000 क्षमतेच्या स्टेडियमबाहेर 2 लाखांचा गर्दीचा विस्फोट
आरसीबीच्या विजय साजऱ्याच्या सोहळ्यासाठी स्टेडियमबाहेर हजारो चाहते गोळा झाले होते. 35,000 प्रेक्षक क्षमतेच्या स्टेडियमबाहेर तब्बल 2 लाखांहून अधिक समर्थक जमल्याने गोंधळ उडाला. याच गर्दीमुळे ही भीषण चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे जल्लोषाचा कार्यक्रम केवळ 20 मिनिटांत संपवण्यात आला.
या कार्यक्रमात आरसीबीचे सर्व खेळाडू, मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर, मेंटॉर दिनेश कार्तिक यांच्यासह सपोर्ट स्टाफ हजर होते. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमारहे देखील उपस्थित होते. त्यांनी यापूर्वी विमानतळावर (airport) संघाचे स्वागत केले होते. “स्थिती गंभीर होत असल्याची माहिती मिळाल्यावर तातडीने कार्यक्रमात बदल करून स्थानिक प्रशासनाच्यासूचनांचे पालन करण्यात आले,” असे आरसीबीच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, घटनास्थळी चेंगराचेंगरी सुरू असल्याचे संकेत मिळाल्यानंतरही कार्यक्रम सुरू का ठेवला गेला, यावर उपस्थितांनी प्रश्न उपस्थित केला आहे.