मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी आज खळबळजनक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, येत्या वर्षभरात पांडुरंगाच्या मर्जीने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे. पुढील वर्षी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पंढरीला येतील. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी सपत्नीक करावी, असे साकडेच मी विठ्ठलाला घातले आहे. मिटकरींच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षभरात नेमके काय घडणार आहे, अशी चर्चा सुरू रंगली आहे.
आमदार अमोल मिटकरी विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुढच्या वर्षी आषाढीची शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना मिळावा, असे साकडे आपण पांडुरंगाला घातले आहे असे सांगितले. त्यावर अजित पवार मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय महापूजा करतील, असा राज्याच्या राजकारणात कोणता चमत्कार घडणार आहे, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला असता, त्यांनी उत्तर दिले की, मी अजित पवारांचा एक भक्त आहे. माझ्या नेत्याने मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय महापूजा करावी असे मला वाटले. त्यामुळे मी देवाला त्याचे साकडे घातले. असे साकडे अनेक जण घालतात. काही जण पाऊस भरपूर पडू दे, शेती चांगली पिकू दे असे साकडे घालतात. त्याच पद्धतीने मी माझ्या नेत्यासाठी देवाला साकडे घातले आहे. मी फक्त अजितदादा यांनी राज्याचे सारथ्य करावे, ही माझी इच्छा पांडुरंगापाशी व्यक्त केली आहे. आता ते कसे होईल ही पांडुरंगाची मर्जी आहे.
विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी अमोल मिटकरी यांच्या अकोल्यातील निवासस्थानी रूपनाथ महाराजांची पालखी आली होती. यावेळीही अमोल मिटकरी यांनी पालखीत रूपनाथ महाराजांकडेही अजितदादांना लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होऊदेत, असे साकडे घातले होते. अजित पवार मुख्यमंत्री होतील, असा दावा अमोल मिटकरी यांनी यापूर्वीही अनेकदा केला आहे. त्यावरून महायुतीतील मित्रपक्षांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. मात्र, अमोल मिटकरी यांनी यांनी याबाबत दावे करणे थांबवलेले नाही.
दोनच दिवसांपूर्वी अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनाही, अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री म्हणून पांडुरंगाची पूजा करतील, अशी अनेकांची भावना आहे. तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला होता. त्यावर सुनेत्रा पवार यांनी असे उत्तर दिले होते की, आपण कायमच चांगली इच्छा करत असतो. पण शेवटी काय द्यायचे आणि काय नाही द्यायचे, हा देवाचा प्रश्न असतो. पांडुरंग नक्की सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतील, अशी मला आशा आहे.
अजित पवारांनी आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा कधी लपवून ठेवलेली नाही. त्यांनी वेळोवेळी त्यांनी ती बोलून दाखवली आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदासाठी आवश्यक गणित सध्या तरी त्यांच्या बाजूने नाही. तरीही अमोल मिटकरी करत असलेल्या दाव्यावर त्यांनी कधीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.