मुंबई – मुंबई काँग्रेसच्या वतीने कुर्ला मदर डेअरीचा भूखंड अदानीला देण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात कुर्ला पूर्व येथून मदर डेरीपर्यंत मोर्चा काढण्यात आला.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी कुर्ल्यातील मदर डेअरची २१ एकर जागा अदानीला देण्यात आली. ही जागा धारावीसाठी देण्यास कुर्लावासियांचा विरोध आहे. विरोध असताना ही सरकारने ही जागा अदानीला दिल्याने कुर्ल्यातील रहिवाशी संतप्त झाले आहेत. यांच्या निषेधार्थ राज्य सरकार आणि अदानीविरोधात काँग्रेस आणि स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढण्यात आला. यावेळी अदानी हटव, कुर्ला बचाव अशी घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महायुतीचे सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेच्या विरोधात आहे. त्यांना जनतेची काळजीच नाही. हे लोक जनतेची फसवणूक करून सत्तेत बसले आहेत. सरकार लोकांसाठी विकास करत आहे का? धारावी , कुर्ला , मुलुंडचा लोकांचा याला विरोध आहे. ते का विरोध करत आहेत, हे सरकारने जाणून घ्यावे. ह्यांना जमीन दिसली की अदानी देत आहेत. हे अदानी सरकार आहे. अदानी या सरकारचे आका आहेत. कुर्ल्यातील मदर डेअरीच्या जमिनीच्या लुटीविरोधात आम्ही लोकशाही मार्गाने निदर्शने करत आहोत. पण पुन्हा एकदा लोकांचा आवाज दडपण्यासाठी मोठा फौजफाटा पाठवण्यात आला. मुंबईच्या हक्कासाठी या अदानी सरकारविरुद्ध आम्ही लढत राहू.