मुंबई- टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील (टिस) आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवर प्र-उपकुलगुरूंची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर आता काही महिन्यांत नवीन कुलगुरुंची नियुक्ती होणार असल्याचे सांगितले जाते. टिसने प्राध्यापक शंकर दास यांना शुक्रवारी रात्री तत्काळ पद सोडण्यास सांगितले. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमिततेचे आरोप करण्यात आले.
टिसच्या आदेशात म्हटले आहे की, “सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर दास यांना तत्काळ प्रभावाने प्र-उपकुलगुरू पदावरून मुक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय केंद्रीय दक्षता आयोगाकडून (सीव्हीसी) आलेल्या तक्रारीनंतर घेण्यात आला. याच पार्श्वभूमीवर पुढील १ ते २ महिन्यात टिस थेट कुलगुरू नियुक्त करणार आहे. यानंतर प्र-उपकुलगुरू पदाची गरज उरणार नाही.” दरम्यान, दास यांच्यावर निधी गैरवापराचा आरोप झाल्यानंतर संस्थेने एक तथ्य-शोध समिती गठित करून प्राथमिक चौकशी सुरू केली. सखोल चौकशी आवश्यक असल्याचा अहवाल दिल्यानंतर या समितीने दुसरी समिती स्थापन केली आहे. अश्या ही समिती या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. दास सध्या स्कूल ऑफ हेल्थ सिस्टम स्टडीजचे अधिष्ठाता आहेत आणि ते आपले शैक्षणिक पद कायम ठेवणार आहेत. दास यांनी २००८ साली टिसमध्ये प्रवेश केला. त्यांना शासकीय, सार्वजनिक क्षेत्र, शैक्षणिक व आंतरराष्ट्रीय संस्थांमधील ३० वर्षाहून अधिक अनुभव आहे. त्यांची ३० जानेवारी २०२४ रोजी प्र-उपकुलगुरू पदी नियुक्ती झाली होती.