ठाकरेंसारखे पवारही बोलू लागले! कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे होईल


मुंबई – महाराष्ट्रात आगामी महापालिका, स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चा रंगली असताना दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यामध्येही मनोमिलन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्यासोबत युतीच्या बाबतीत म्हटले की, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही तसाच सूर लावत म्हटले की, कार्यकर्त्यांच्या मनात जे असेल तोच निर्णय पक्ष घेईल.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवार यांनी वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांच्याशी जवळजवळ अबोला धरला होता. एका व्यासपीठावर येऊनही दोघे एकमेकांशी बोलणे टाळत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते विविध बैठकांमध्ये एकत्र येऊन बातचीत करताना पाहायला मिळत आहे. तेव्हापासून दोन्ही राष्ट्रवादीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याबाबत आशावादी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी काल म्हटले की, पांडुरंगाची इच्छा असेल तर बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात. 10 जून रोजी पुण्यात पक्षाचा मेळावा होत आहे. त्यामुळे 10 तारखेपर्यंत वाट बघा, असे संकेतही मिटकरी यांनी दिले. तेव्हापासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना आणखी जोर चढला आहे.
आज सुप्रिया सुळे यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या की, हा माझा निर्णय नाही. हा निर्णय पक्ष घेणार आहे.
कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातच शरद पवार यांच्या कामाची पद्धत तुम्ही सर्वांनी सहा दशके पाहिली आहे.
शरद पवार जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होते. त्यामुळे जो पक्षाचा निर्णय असेल, तो पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आणि कार्यकर्त्यांच्या मनात जे असेल त्यानुसारच घेतला जाईल. आम्ही कोणताही निर्णय वैयक्तिक घेत नाही.