तुम्हीच सांगा! मनसेशी युती करायची का? उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्त्यांना थेट सवाल


मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज ठाकरेंचा मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्या संभाव्य युतीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी या दोघांनी एकत्र यावे, अशी इच्छा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. आज उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी माजी नगसेवकांना, मनसेसोबत युती करायची का नाही? असा थेट प्रश्न विचारला. यावेळी अनेक माजी नगरसेवकांनी मनसेसोबत युती झाल्यास फायदाच होईल. विशेषतः मुंबईत युतीसाठी सकारात्मक वातावरण आहे, अशी स्पष्ट भूमिका मांडली.
आगामी महापालिका निवडणुकांसाठी उबाठा गट सक्रिय झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मातोश्रीवर माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीसाठी शिवसेना भवन येथे निवडणूक कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांकडून पक्षाविषयी लोकांची काय मते आहेत, पक्षाला निवडणुकीत अनुकूल वातावरण आहे का, हे जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेसोबत आपण युती करावी का? युती झाली काय फरक पडेल? अशी विचारणा नगरसेवकांकडे केली. या प्रश्नावर माजी नगरसेवकांनी मनसेसोबत युती करण्याच्या बाजूने मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, मनसेसोबत युती करण्यासाठी सध्या मुंबईसह राज्यभरात अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे मनसेसोबत युती करायला हरकत नाही. मनसेसोबत युती केली तर निवडणुकीत निश्चित आपल्याला फायदा होईल. माजी नगरसेवकांचे मत ऐकून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना आश्वस्त केले की, पुढील निर्णय लवकरच घेतला जाईल. जो निर्णय घेईन तो तुम्हाला विचारल्याशिवाय घेणार नाही.
नगरसेवकांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी असे आवाहन केले की, येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तयारीला वेग द्या. महापालिका निवडणूक ही आपल्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे. यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने कामाला लागले पाहिजे. त्यामुळे सामान्य जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा, लोकांच्या घरी जा त्यांचे प्रश्न ऐका आणि सोडवा. पक्षाची प्रतिमा जनतेसमोर अधिक प्रभावीपणे मांडा. आपल्या कामगिरीचा आढावा द्या.
या बैठकीनंतर उबाठा गटाचे माजी नगरसेवक सुरेश पाटील म्हणाले की, आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली, यावेळी त्यांनी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात निवडणुका लागू शकतात, असे सांगितले. आम्ही यंदा महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा, असा निर्धार केला आहे. बैठकीत युतीसंदर्भात आम्हाला विचारणा झाली. त्यावर आमचे स्पष्ट मत आम्ही मांडले. कार्यकर्ते एकत्र काम करत आहेत आणि त्याचबरोबर दोन्ही पक्ष आंदोलनातही एकत्र सहभागी होत आहेत.
अजाईल कंपनीविरोधात मनसे, उबाठाचे एकत्र आंदोलन
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चेने जोर धरल्यापासून मनसे आणि उबाठाचे कार्यकर्ते एकत्र आंदोलने करत आहेत. आज मुंबईतील इंडिगोची उपकंपनी असणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात आज उबाठा आणि मनसे कार्यकर्त्यांनी एकत्र आंदोलन केले. अजाईल कंपनीच्या व्यवस्थापनाने केलेला पगारवाढीचा करार कामगारांना मान्य नाही. हा करार रद्द करण्यासाठी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आणि उबाठाचे खासदार अरविंद सावंत तसेच मनसेचे वरळी विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांच्या नेतृत्वाखाली चुनाभट्टी येथील प्रादेशिक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी उबाठाचे नेते संतोष कदम तर मनसे नेते दीपक धुरी हेही उपस्थित होते. अजाईल कंपनीने भारतीय कामगार सेना आणि हवाई कर्मचारी सेनेला विश्वासात न घेता तीन महिन्यांपूर्वी आलेल्या तिसऱ्याच संघटनेसोबत करार केला. या करारात कर्मचाऱ्यांना दीड ते दोन हजार रुपये पगारवाढ दिली. सरकारच्या दबावामुळे हा करार करण्यात आला, असा कर्मचाऱ्यांनी आरोप आहे. याचा विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले, तसेच कर्मचाऱ्यांसाठी 4000 रुपये पगारवाढ आणि 20 हजार रुपये बोनसची मागणी करण्यात आली.