प्रसिद्ध लालबाग राजा गणेशाचे विसर्जन कुठे करणार? मैदानात 27 फूट खोल कृत्रिम तलाव उभारणार?


मुंबई- सर्वोच्च न्यायालयात केंद्रीय प्रदूषण मंडळाने स्वतःच्या भूमिकेशी फारकत घेत निवडणूक राजकारणात प्रवेश करीत पीओपी मूर्तींना ऐच्छिक परवानगी दिली. यामुळे घरातच विसर्जन होऊ शकणाऱ्या छोट्या मूर्तींचा प्रश्न सुटला असला तरी सार्वजनिक मंडळांच्या उंच गणेशमूर्तींचे विसर्जन कुठे करायचे हा प्रश्न गंभीर बनला आहे. पीओपी मूर्तींना परवानगी दिली असली तरी त्यांचे नैसर्गिक स्त्रोत्रात विसर्जनाला परवानगी दिलेली नाही. प्रसिद्ध लालबाग राजाची मूर्ती ही 18 फूट ऊंच असते, गणेशगल्ली येथील गणेशमूर्ती 21 फूट उंच असते, चिंचपोकळी आणि खेतवाडी येथील मूर्ती आणखी उंच असतात. गेल्या वेळी खेतवाडीत 27 फूट उंच गणेशमूर्ती साकारली होती. या सर्व उंच मूर्ती पीओपीच्या असतात. यामुळे आता मुंबईत ठिकठिकाणी या मूर्तींच्या विसर्जनासाठी 27 फूट खोलीचे कृत्रिम तलाव उभारावे लागणार आहेत. राज्य सरकारची याबाबत काय भूमिका आहे ते त्यांना 30 जून रोजी न्यायालयात मांडावे लागणार आहे. तूर्त विसर्जनाच्या समस्येमुळे मूर्तिकार ऑर्डर घेण्यास सध्या तयार नाहीत.
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी पत्रक प्रसिद्ध करून याबाबत चिंता व्यक्त करीत काही समस्या मांडल्या आहेत. यावर्षी पालिका निवडणुका असल्याने वाटेल तो मार्ग काढला जाईल. परंतु पुढील उत्सवावेळी समस्या उद्भवणारच आहे. नरेश दहिबावकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, उंच मूर्तींसाठी कृत्रिम तलाव हे मोकळ्या जागांवर अथवा मैदानात बांधण्यात येणार का? अशा जागा कुठे आहेत? इतक्या कमी वेळात हे तलाव बांधून होतील का? विसर्जन मिरवणूक तलाव परिसरात येईल तेव्हा लाखोंची गर्दी हाताळता येईल का? समुद्रात विसर्जन करताना मोजकेच कार्यकर्ते आत जातात व बाकी किनाऱ्यावर उपस्थित असतात. मात्र आता सर्वच तिथे असतील तेव्हा नियंत्रण कसे ठेवता येईल? या सर्व बाबींचा राज्य सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी समितीने केली आहे. समितीने उपस्थित केलेल्या समस्या गंभीर असून, सरकारला यातून लवकर मार्ग काढावा लागणार आहे.
पीओपी मूर्तींचे नैसर्गिक स्त्रोतात विसर्जन केल्याने प्रदूषण होते हा निर्णय केंद्रीय प्रदूषण मंडळाने घेतल्यापासून उंच गणेशमूर्तींचे विसर्जन ही मोठी समस्या झाली आहे. पीओपीमुळे प्रदूषण होत नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न अजूनही यशस्वी झालेला नाही. दरवर्षी गणेशोत्सवात ही समस्या उपस्थित होते आणि तात्पुरती वेळ मारून नेली जाते. कायमस्वरूपी निर्णय होत नाही. गणेशमूर्तींची उंची कमी राहावी यासाठी खूप प्रयत्न झाले. उंची कमी होणे हेच हिताचे आहे हे पटत असूनही केवळ काहींच्या विरोधामुळे हा निर्णय झाला नाही. त्याचबरोबर मंडपात चित्रपटाची गाणी वाजवणे, कोणत्याही दिवशी विसर्जन करणे, विसर्जनाला मूर्ती नेल्यानंतरही आरती करणे या सर्व अयोग्य गोष्टींना आळा घालणे यावरही चर्चा होऊन निर्णय घेतला पाहिजे.