लोकल दुर्घटनेप्रकरणी मनसेचा ठाणे रेल्वे स्थानकात मोर्चा

ठाणे – मुंब्रा लोकल दुर्घटनेतील प्रवाशांच्या अपघाताच्या निषेधार्थ आज गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मनसेने मोर्चा काढला होता. या मोर्चाचे नेतृत्व मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केले. यावेळी मनसेचे झेंडे आणि प्रशासनाच्या विरोधी घोषणाबाजीने स्थानक दणाणले होते. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यरेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून विविध मागण्यांचे निवेदन दिले. याशिवाय ८ दिवसात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले की, प्रत्येक रेल्वे स्थानकात वर्तमानपत्र किंवा वडापावचे दुकान का पाहिजे ? डिजिटल युगात लोक मोबाईलमध्ये बातम्या वाचतात. आम्ही रेल्वे स्थानकात आल्यावर पाच ते दहा मिनिटांमध्ये ट्रेनमध्ये चढतो. त्यामुळे वडापाव स्टॉलची गरज नाही. तुमच्या लोकांना पोसायला काढलेले हे टेंडर बंद करा आणि रेल्वे स्थानकातील हे स्टॉल काढून लोकांना बसायला जागा करा. पुढच्या आठ दिवसांत हे स्टॉल्स निघाले पाहिजे. अन्यथा आम्ही ते उखडून फेकून देऊ. रेल्वे प्रशासन नागरिकांना तिकीट आणि पास कशासाठी देते? एवढ्या गर्दीत लोकांनी प्रवास कसा करायचा? लोक घरी परत येण्यासाठी रिटन तिकीट काढतात. मात्र आता त्यांना घरी येण्याची शाश्वती नसल्याने ते सिंगलच तिकीट काढतील. रेल्वे प्रशासन फक्त लांब पल्ल्याच्या गाड्यांचा विचार करते. मेल आल्या की लोकल ट्रेन थांबवल्या जातात. रेल्वे अपघातात जखमी झालेल्या ८ हजार लोकांच्या केसेस पेंडिंग आहेत. काल झालेल्या अपघातात जीव गमावलेल्या आणि पाय गमावलेल्या लोकांबाबत रेल्वेची भूमिका काय आहे? ठाणे रेल्वे स्थानकातील दहापैकी आठ स्वच्छतागृह बंद आहेत. रेल्वे प्रवासी तिकीटाचे पैसे देतात तरीही आम्हाला सुविधा का मिळत नाहीत?