पुणे– वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हगवणे कुटुंबाने तिच्या चारित्र्यावर संशय घेत अनेक आरोप केले होते. तिचे वडील अनिल कस्पटे यांनी आज हे सर्व आरोप फेटाळून लावले. हे सर्व थांबवा. माझी मुलगी तर गेली. आता तिची बदनामी करू नका, अशी हात जोडून विनवणी करताना त्यांना अश्रू आवरले नाहीत. मृत्युपूर्वी वैष्णवीला सात ते आठ दिवस सतत मारहाण केल्याचा आरोप करत त्यांनी हगवणे कुटुंब प्रत्येक वेळी आपल्याबरोबर कसे वागले, याचा पाढाच वाचून दाखवला.
वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, हगवणे कुटुंबाने केलेले कृत्य आणि माझ्या मुलीचा घेतलेला बळी याला त्यांना वेगळी कलाटणी द्यायची आहे. त्यांना तो गुन्हा लपवायचा आहे म्हणून अशा पद्धतीचे आरोप केले जात आहेत. माझ्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. वैष्णवीच्या मोबाईल चॅटबाबत मला हगवणे कुटुंबाने कुठलीही माहिती दिलेली नाही. तिचा मोबाईल मी काढून घेतला असा त्यांनी आरोप केला. पण मीच तिला मोबाईल दिला होता. त्याचसोबत शशांकलाही दीड लाखांचा मोबाईल घेऊन दिला होता. कारण त्याने त्या मोबाईलची मागणी केली होती. हा मोबाईल घेण्यासाठी तो वाकड येथील क्रोमा स्टोअरमध्ये आला होता. त्यानंतर त्याने वैष्णवीला तिथे बोलावून घेतले. तिला सांगितले की, तुझ्या पप्पांना सांग मला मोबाईल हवा आहे. तिने मला फोन करून तिथे बोलवून घेतले. मी त्याला मोबाईल विकत घेऊन दिला. त्या मोबाईलचे हप्ते आजही मी भरतो आहे. हे सांगताना कस्पटे यांनी मोबाईलचे बिल दाखवले.
ते पुढे म्हणाले की, हगवणे कुटुंब म्हणते की, त्यांनी तिचा हुंड्यासाठी छळ केला नाही, गाडी मागितली नाही, त्यांच्याकडे 5 कोटी 90 लाखांच्या गाड्या आहेत. पण हे सगळे खोटे आहे. हगवणे कुटुंबाकडे एकच फोर्ड गाडी नाही. त्यांच्याकडे जी 90 लाखांची गाडी आहे ती चंद्रकांत हुचडे यांच्या नावावर आहे. शशांक हगवणेने माझ्याकडे लग्नात गाडी मागितली होती. मी त्याच्यासाठी एमजी हेक्टर गाडी बूक केली होती. मात्र त्यांनी माझ्यासोबत वाद घालून फॉर्च्युनर गाडी मागून घेतली. फॉर्च्युनर दिली नाही, तर लग्नाला उभे राहणार नाही, लग्नातून निघून जाईन अशा धमक्या देऊन त्याने माझ्याकडून ही गाडी घेतली. याआधी हगवणे कुटुंबामुळे वैष्णवीची दोन लग्ने मोडली होती, त्यामुळे आम्ही दबावाखाली हे लग्न ठरवले. त्यांनी अधिक महिन्यात जावयाला चांदीचे ताट, गौरी पाहिजे असाही हट्ट धरला होता. तोपण मी पूर्ण केला.
अनिल कस्पटे पुढे म्हणाले की, वैष्णवीचे अंत्यसंस्कार झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या मोठ्या भावाने तिचे बाळ आमच्याकडे द्या या मागणीसाठी आरोपी नणंद करिश्मा हगवणेला फोन केला होता. परंतु तिने आम्हाला बाळ आणून दिले नाही. त्यानंतर आरोपी राजेंद्र हगवणेचे मोठे भाऊ जयप्रकाश हगवणे यांनी आम्हाला फोन करून सांगितले की, बाळाची हेळसांड होत आहे, तुम्ही बाळाला घेऊन जा. त्यानंतर माझा भाऊ हे बाळाला आणायला हगवणेंकडे गेला, तेव्हा ते बाळ निलेश चव्हाण यांच्याकडे आहे असे सांगितले. माझ्या भावाने बाळाची मागणी केली असता निलेश चव्हाणने त्यांना बंदुकीचा धाक दाखवला. आपली सून मयत झाली असताना हगवणे यांनी बाळाला निलेश चव्हाणकडे कसे दिले? बाळ वैष्णवीकडे होते. मग ते बाळ निलेश चव्हाणकडे कसे पोहोचले? याचा अर्थ निलेश चव्हाणदेखील या कटात सहभागी आहे. त्यामुळे त्यालाही सहआरोपी करा. आमचा पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांशी काहीही संबंध नाही असे ते सांगतात. मात्र आम्ही मामाच्या जीवावर काहीही करू शकतो, अशी धमकी हगवणेंकडून आम्हाला सतत दिली जात होती.
वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी सलग सात-आठ दिवस वैष्णवीला वेगवेगळ्या शस्त्रांनी मारहाण झाल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. याबाबत अनिल कस्पटे म्हणाले की, वैष्णवीने आत्महत्या करण्याआधी सात ते आठ दिवस सातत्याने हगवणे कुटुंब तिला मारहाण करत होते. 10 तारखेला वैष्णवी घरी आली होती. तेव्हा ती आईला याविषयी बोलली होती. मारहाण होत आहे, छळ करत आहेत, असे ती म्हणाली. पण पती शशांकचा फोन आल्यावर तिला दुसऱ्याच दिवशी परत जावे लागले होते. परंतु हे कुटुंब आता वैष्णवीवर काहीही आरोप करत आहेत.
सासू, नवरा, नणंदेला न्यायालयीन कोठडी
वैष्णवी आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेला पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे यांना काल शिवाजीनगर न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने या तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांनी वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला. या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सुपेकरांचा उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचे नाव वारंवार चर्चेत येत होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील याप्रकरणी त्यांच्या विरोधात कारवाईची जोरदार मागणी केली होती. सुपेकर हे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक (मुख्यालय – कारागृह विभाग) या पदावर कार्यरत होते. त्यांच्याकडे नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर (पूर्व व पश्चिम), नागपूर आणि मध्य विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता. मात्र आता त्यांची बदली पुणे विभागात करण्यात आली आहे आणि त्यांच्याकडील सर्व अतिरिक्त जबाबदाऱ्या काढून घेण्यात आल्या आहेत. गृह विभागाच्या या निर्णयामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
