मुंबई – शिवसेनेच्या स्थापनेला आज ५९ वर्षे झाली. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ठाकरेंच्या शिवसैनिकांना खुल्या पत्रातून ठाकरे पिता-पुत्राची साथ देण्याचे आवाहन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेते व कार्यकर्त्यांवर टीका केली.त्याचबरोबर त्यांनी उबाठा पुन्हा सत्ता मिळवणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला.
उबाठा नेते अंबादास दानवे यांनी पत्रात लिहिले की, महाराष्ट्राचे राजकारण आज गढूळ झाले आहे. निष्ठेला विकत घेण्यासाठी आमिषाचे बाजार भरवले आहेत. या परिस्थितीतही स्थिर राहायचे असेल तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला एक मंत्र जपायला पाहिजे. तो म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण. या मंत्राचा शिवसैनिकांशिवाय सर्वांना विसर पडला आहे. आपल्यातून गेलेल्या गद्दारांचा या मंत्राशी काडीचाही संबंध नाही. आपण छातीठोकपणे सांगू शकतो की, होय बाळासाहेब ठाकरे आमच्या संघटनेचा बाप आहे. गद्दार गटाने हे शब्द उच्चारले तर दिल्लीतील शाह डोळे वटारतात. चतकोरीच्या बदल्यात खाल्ल्या मिठाला न जागणाऱ्या या गद्दारांना सूर्याजी पिसाळ म्हणावे, खंडोजी खोपडे म्हणावे की अजून काही हे काळच ठरवेल.आज मी तुमच्या प्रत्येकात स्वतःवर विश्वास असणारा असा एक कर्णधार कपिल देव पाहतो. फरक एवढाच आहे की ते क्रिकेटच्या मैदानावर खेळले, आपण राजकीय पटलावर आहोत. आपला दरारा आपली ताकद आहे. तो तसूभरही कमी होता कामा नाही. गल्ली ते दिल्ली तो असलाच पाहिजे. सत्ता आपोआप आपल्या मागे फरफटत येईल. सरकार राज्याचे असो किंवा केंद्राचे जनतेच्या मुद्यांवर सरकारला घाम फोडून आपल्याला दरारा कायम ठेवायचा आहे. आपल्याकडे अनेक पराक्रम करणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाचा एक आदर्श कर्णधार आहे. त्यांचा दरारा उभ्या जगाने पाहिला आहे. आपण त्यांचे बछडे आहोत, आपल्याला कोणाचे कसले भय? आपल्या मुळावर उठणाऱ्या प्रत्येकाचा हिशेब आपल्यालाच करावा लागणार आहे. आज ठाकरे पिता-पुत्र पाय रोवून उभे आहेत. त्यांना मजबुती द्यायची हे आपले कर्तव्य आहे. कोणत्याही क्षणिक मोहाला बळी न पडता आपण ते यशस्वीपणे बजावूच. परत लढू, परत जिंकू.