मुंबईतील समुद्राचे खारे पाणी गोडे करणार ! २१ कंपन्या इच्छुक ! निविदा प्रक्रियेत परदेशी दोन कंपन्या

Brihanmumbai Municipal Corporation

मुंबई – मुंबईकरांची पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता पालिका प्रशासनाने (BMC) मुंबईतील समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याची योजना आखली आहे. या निःक्षारीकरण प्रकल्पासाठी चौथ्यांदा निविदा मागवल्या आहेत. त्यासाठी घेण्यात आलेल्या पूर्वबोली बैठकीमध्ये तब्बल २१ कंपन्यांनी (21 companies)आपले स्वारस्य दाखवले आहे. या इच्छुक कंपन्यांमध्ये आखाती देशातील (Middle East) एका आणि स्पेनमधील (Spain)एका कंपनीचा समावेश होता. मनोरी येथे उभारल्या जाणार्‍या या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ४४०० कोटींच्या घरात असणार आहे.
पालिकेने गेल्या महिन्यातच २८ मे पासून या निःक्षारीकरण प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे. यासंदर्भातील पूर्वबोली बैठकीला हजेरी लावलेल्या २१ कंपन्यांना येत्या २६ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या (MVA)काळातच या प्रकल्पाला सुरुवात होणार होती. परंतु राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर हा प्रकल्प तीन- चार वर्षांपासुन रखडला गेला. मात्र आता हा प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी चौथ्यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ४४०० कोटी रुपये इतका असून आधीच्या खर्चात १ हजार कोटींची वाढ झाली असल्याची माहिती पालिका अधिकार्‍यांनी दिली. या प्रकल्पांतर्गत पाणी आणण्यासाठी तीन जलबोगदे उभारावे लागणार आहेत.