मुंबई – राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेला पावसाळा अखेर सक्रिय झाला आहे. दोन दिवस कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील ४८ तासांत मान्सून संपूर्ण विदर्भ व्यापणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, पश्चिम घाट, सांगली, कोल्हापूर या भागातही अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जरी केला आहे. पुणे ,नाशिक, कोल्हापूर, सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट जरी करण्यात आला आहे.