कोल्हापूर – कोल्हापुरातील (Kolhapur) हातकणंगलेमधील धार्मिक शिक्षण देणार्या शाळेतील (मदरसा) एका विद्यार्थ्याने विजेचा शॉक देऊन दुसर्या विद्यार्थ्याची हत्या (Murder News) केली. बिहारमधील अल्पवयीन मुलाने सुट्टी मिळावी, यासाठी हे भयनाक कृत्य केल्याचे समजते. या प्रकरणी हातकणंगले पोलीस (Police)ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आणि त्याची बाल निरीक्षणगृहात रवानगी केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते येथे ही धार्मिक शिक्षण देणारी शाळा आहे. या संस्थेत सुमारे ६० हून अधिक मुले शिक्षण घेतात. त्यापैकी अनेकजण बिहारचे आहेत. १५ जूनच्या रात्री या शाळेतील अकरा वर्षीय विद्यार्थ्याला त्याच्या अल्पवयीन सहकाऱ्याने तोंडात कापडाचा बोळा घालून विजेचा शॉक दिला. त्यात त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी संस्थेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले, शिक्षकांची आणि मुलांची चौकशी केली असता आरोपी अल्पवयीन मुलाने हत्या केल्याचे कबुल केले. घरापासून शेकडो किमी दूर राहून धार्मिक शिक्षण घ्यावे लागत असल्याने तो कंटाळला होता. शाळा बंद पडून घरी जायला मिळावे यासाठी त्याने आपल्याच मित्राची हत्या केली.