‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्य संकटात’, निधीच मिळत नसल्याचे म्हणत शिंदे गटाच्या आमदाराने व्यक्त केली नाराजी

MLA Sanjay Gaikwad on Ladki Bahin Yojana

MLA Sanjay Gaikwad on Ladki Bahin Yojana | महायुती सरकार सत्तेत आल्यापासून ‘लाडकी बहीण’ योजना चर्चेत आहे. परंतु, याच योजनेवरून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटातील (शिंदे गट) आमदारांमध्ये आणि मंत्र्यांमध्येही अस्वस्थता वाढल्याचे दिसून येत आहे. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडत असून, इतर विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार अनेक आमदार करत आहेत.

इतर विभागांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला जात असल्याची तक्रार देखील अनेकदा करण्यात आली आहे. त्यातच आता शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी या योजनेमुळे राज्य संकटात असल्याचे मत व्यक्त केले आहे.

‘लाडकी बहीण योजने’मुळे राज्य संकटात आहे.”, असे वक्तव्य गायकवाड यांनी केले आहे. गायकवाड यांच्या मते, या योजनेमुळे इतर कोणत्याही योजनेला पैसे मिळालेले नाहीत आणि मागील अधिवेशनात जाहीर झालेला निधीही आमदारांना मिळालेला नाही.

राज्याच्या आर्थिक स्थितीवरून विरोधकांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना गायकवाड म्हणाले, “लाडक्या बहिणींमुळे राज्य संकटात आलं आहे हे नाकारता येत नाही. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारासह सर्वच बाबतीत झालेला आहे. एकाही आमदाराला बजेटचे पैसे मिळालेले नाहीत.”

सव्वा लाख कोटींची तूट आणि निधीवाटपावरून नाराजी

संजय गायकवाड यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात सव्वा लाख कोटी रुपयांची तूट असल्याचेही नमूद केले. यामुळे विकासकामांवर परिणाम झाल्याचे आणि कर्मचाऱ्यांच्या पगारावरही त्याचा परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, येत्या जुलै-ऑगस्टपर्यंत ही परिस्थिती सुधारेल आणि तूट भरून निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.