‘राज्यातील काही मंत्र्यांचे फोन टॅप होत आहेत’, रोहित पवारांचा मोठा दावा; म्हणाले…

Rohit Pawar on Phone Tapping

Rohit Pawar on Phone Tapping: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘फोन टॅपिंग’ आणि हेरगिरीचा मुद्दा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. महाराष्ट्रातील काही मंत्र्यांचे फोन टॅप (Phone Tapping) होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रोहित पवारांच्या या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र पलटवार करत त्यांना पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, काही मंत्र्यांचे फोन बऱ्याचदा नॉट रिचेबल येत असून आपले फोन टॅप होत असल्याने मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवततात, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. बघुया या केवळ चर्चा आहेत की वास्तव हे येत्या काळात कळेलच..! त्यांच्या या इशाऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अजित पवारांचे प्रत्युत्तर : “पुरावे द्या, हवा सोडू नका”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवारांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले. “आरोप करणं सोपं आहे, पण त्यामागे ठोस पुरावे असायला हवेत. कोणत्याही मंत्र्याचा फोन टॅप होत असेल तर त्याचा कोणत्या आधारावर संशय घेताय?” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. त्यांनी असा कोणताही गैरप्रकार सरकारकडून होत नसल्याचे स्पष्ट केले.

फेरबदलाच्या चर्चेतून निर्माण झाला ‘टॅपिंग’चा वाद

राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू असताना या फोन टॅपिंगच्या आरोपांनी वातावरण अधिकच तापले आहे. विरोधी पक्षांकडून 5-6 नेत्यांचे मंत्रिपद जाणार असल्याचा दावा केला जात आहे.

त्याचवेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने, त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत आहे. हे सगळं पाहता महायुतीतील अंतर्गत नाराजी उफाळून येत असल्याची चर्चा आहे. त्यातच आता रोहित पवारांनी मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याचे म्हटले आहे.