मुंबई- पहलगाम हल्ल्यानंतर (Pahlgam terror attack) जम्मू-काश्मीरमधील पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात घाटकोपरमधील कामराज नगर झोपडपट्टीतील अग्निवीर जवान मुरली नाईक ( Murli Naik) यांना वीरमरण आले. देशासाठी बलिदान देणाऱ्या या जवानाला शहीद सैनिकाचा दर्जा देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.सरकारने ही मागणी पूर्ण केली नाही, तर या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
आंबेडकर म्हणाले की, लाईट इन्फंट्रीमध्ये कार्यरत असलेले, घाटकोपरमधील (Ghatkopar) रमाबाई आंबेडकर नगर येथील रहिवासी आणि अग्निवीर जवान मुरली नाईक यांना सेवेदरम्यान वीरगती प्राप्त झाली. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडून त्यांच्या कुटुंबीयांना अद्याप कोणतीही ठोस मदत जाहीर करण्यात आलेली नाही, ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे. सरकारने मुरली नाईक यांच्या कुटुंबीयांना तातडीने एक कोटी रुपयांची मदत जाहीर करावी आणि त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे. सैनिकांना दिल्या जाणाऱ्या सवलती, सन्मान आणि मदतीच्या सुविधा अग्निवीर जवानांनाही मिळाल्याच पाहिजेत. महाराष्ट्र सरकारने आधीच जाहीर केले आहे की, सेवेदरम्यान वीरगती प्राप्त झाल्यास कुटुंबीयांना आर्थिक मदतीची तरतूद आहे. मग मुरली नाईक यांच्या बाबतीत अपवाद का? याबाबत मी स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. लवकरच त्यांच्या भेटीमध्ये हा मुद्दा मी मांडणार आहे. मात्र, जर सरकारने यावर ठोस भूमिका घेतली नाही, तर आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याशिवाय राहणार नाही.