Mumbai Cab Fare: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत (Mumbai) झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. याच परिस्थितीचा फायदा घेऊन काही ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांनी (Mumbai Cab Fare) प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारल्याचे पाहायला मिळाले.
या प्रकारानंतर आता महाराष्ट्र सरकारने या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी या प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांत शहरात रेल्वे सेवा ठप्प झाली होती, तेव्हा अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावरकॅब कंपन्यांच्या वाढीव भाड्याबाबत तक्रारी केल्या होत्या. सामान्यतः 200 रुपये असलेले भाडे काही वेळा 600 ते 800 रुपयांपर्यंत वाढले होते.
आतापर्यंत 147 कॅब चालकांवर कारवाई (Mumbai Cab Fare)
या तक्रारींची दखल घेत मंत्री सरनाईक यांनी मोटार वाहतूक विभागाला तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याशीही चर्चा केली आणि सायबर सेलला अशा बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यास सांगितले.
या आदेशानंतर, गेल्या दोन दिवसांत परिवहन विभाग आणि पोलिसांनी मिळून 147 ॲप-आधारित कॅब सेवांवर कारवाई केली आहे. यापैकी 36 कॅब चालकांनी मुंबई आणि उपनगरात प्रवाशांकडून जास्त भाडे घेतल्याचे आढळले.
मंत्र्यांनी स्पष्ट केले की, नैसर्गिक आपत्तीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांची लूट करणाऱ्या कंपन्यांना सोडले जाणार नाही. यापुढेही अशा तक्रारींची गंभीर दखल घेऊन कारवाई केली जाईल.
हे देखील वाचा –
जीएसटीमध्ये आता 4 नव्हे तर फक्त 2 स्लॅब; मंत्रिगटाची मान्यता; वाचा काय होणार स्वस्त
Hero MotoCorp ची नवीन Glamour X 125 बाईक लाँच; किंमत 90 हजार रुपयांपेक्षा कमी