Maharashtra Election Voting | 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Election) सायंकाळी 6 नंतर संशयास्पदरित्या मतदानाची आकडेवारी वाढली असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जात आहे. विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मतदानातील वाढीव आकडेवारीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
या वाढीव 76 लाख मतांबाबत तपासणीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे.
‘वेळ वाया गेला’, न्यायालयाने नोंदवले निरीक्षण
ही याचिका वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे यांनी दाखल केली होती, ज्यात ज्येष्ठ वकील आणि नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आपला निकाल दिला. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णीआणि न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या पुराव्यांच्या अभावावर नाराजी व्यक्त केली. “काल दिवसभर ही याचिका ऐकून आमचा वेळ वाया गेला,” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. एका वर्तमानपत्रातील वृत्ताच्या आधारावर याचिका दाखल करण्यात आली होती आणि कोणतेही ठोस कागदपत्रे किंवा पुरावे सादर केले गेले नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
युक्तिवादात काय घडले?
प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना म्हटले होते की, मतदान पारदर्शकपणे झाले नसल्याचे सिद्ध झाल्यास न्यायालयाने विधानसभा बरखास्त करण्याचा न्यायालयाला अधिकार आहे. मात्र, न्यायालयाने मतदानात कोणताही अनुचित प्रकार घडल्याची ठोस माहिती सादर झाली नसल्याचे निरीक्षण नोंदवले.
याचिकाकर्ते चेतन अहिरे यांनी आरोप केला होता की, मतदान संपल्यानंतर अचानक 76 लाख मतांची नोंद झाली, जी पूर्वीच्या एकूण आकडेवारीशी जुळत नाही. मात्र, न्यायालयाने हे आरोप योग्य पुराव्यांसह सिद्ध झाले नसल्याचे सांगत याचिका फेटाळली.