Nitesh Rane | भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या एका वक्तव्यामुळे सत्ताधारी महायुतीत अंतर्गत नाराजी वाढल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणेंचे बंधू आणि शिवसेना नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे सत्ताधारी आघाडीतील तणाव उघड झाला आहे.
निलेश राणे यांनी आपल्या ‘एक्स’ (ट्विटर) या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “नितेशने जपून बोलावे, मी भेटल्यावर बोलेनच. पण, आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे. पण, आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही.”
नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य काय?
धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना नितेश राणे म्हणाले होते की, “सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसला आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. कोणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसेही नाचले तरी देशात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत
नितेश राणे यांच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली. या वक्तव्याद्वारे त्यांनी एकप्रकारे शिंदे गटालाच इशारा दिल्याची चर्चा रंगली. त्यानंतर त्यांचे बंधू निलेश राणे यांनी त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला. अशाप्रकारे, जाहिररित्या भावालाच जपून बोलण्याचा सल्ला दिल्याने दोन्ही राणे बंधूंमध्येच वाद निर्माण झालाय का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.