Pune Bridge Collapse | पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरी पूल कोसळून काहीजणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही पर्यटक नदीत बुडाले, ज्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथक (Rescue Team) आणि पोलिसांनी (Police) तातडीने केलेल्या कारवाईत 38 जणांना वाचवण्यात यश आले.
या दुर्घटनेनंतर सामान्य जनता आणि विरोधी पक्षांनी सरकार तसेच प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारावर तीव्र प्रश्नचिन्ह (उपस्थित केले आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेअध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील शब्दांत संताप व्यक्त केला आहे. अशा घटना घडतातच कशा असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काही जणं मृत्युमुखी पडलेत. नक्की हानी किती झाली आहे याचा अंदाज आला नाहीये. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण… pic.twitter.com/jquupxVWC4
— Raj Thackeray (@RajThackeray) June 16, 2025
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी ‘X’ (ट्विटर) वर ट्वीट करत या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे म्हणाले की, काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काही जणं मृत्युमुखी पडलेत. नक्की हानी किती झाली आहे याचा अंदाज आला नाहीये. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.
हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला ? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की, ‘बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे…’ पण मुळात हा प्रसंग का येतो ? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळयाच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही ? बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीत ? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग ?
लोकांनी देखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. अशा धोकादायक ठिकाणी जाताना, आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं. अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असं नाही. पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवं. आत्ता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यातल्या बऱ्याच शहरांत पाणी साठणं, रस्त्यांची चाळण होणं, पूल पाडणं अशा घटना सुरु झाल्यात. या सगळ्यात सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पहावं, असे ते म्हणाले.