Hindi language Controversy | महाराष्ट्रातील शाळांमध्ये नवीन शिक्षण धोरणांतर्गत पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध होत आहे. या निर्णयाविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र मोर्चे काढण्याची घोषणा केली होती.
मात्र, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकजुटीचे दर्शन घडवत, दोन्ही ठाकरे बंधूंनी आता एकत्र येत 5 जुलै 2025 रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करू शकतो, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
एकत्रित मोर्चाची अधिकृत घोषणा
यापूर्वी राज ठाकरे यांनी 5 जुलै, तर उद्धव ठाकरे यांनी 7 जुलै रोजी स्वतंत्र मोर्चे काढण्याची घोषणा केली होती. पण मराठीच्या मुद्द्यावर दोन वेगवेगळे मोर्चे का, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकजुटीने लढण्याचा निर्णय घेतला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राज आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित छायाचित्र शेअर करत लिहिले, “महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!”
महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल!
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2025
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/A8ATq2ra0k
मनसे नेते संदीप देशपांडे या बाबत बोलताना म्हणाले की, “राज ठाकरे यांनी काल केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. मराठी माणसाची एकत्रित ताकद दाखवण्याची ही वेळ आहे. हा मोर्चा मराठी भाषेच्या रक्षणासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, मराठी भाषा हा राजकीय मुद्दा नाही, आणि या मोर्चातून महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलण्याची ताकद आहे.