सरकारच्या डोक्यामध्ये नासके बटाटे; खा. राऊतांची टीका

Sanjay Raut criticises mahayuti government

मुंबई – तिसऱ्या भाषेबाबत आधीच आदेश असेल, तर नवीन आदेश का काढावा लागत आहे? या सरकारच्या डोक्यामध्ये नासके बटाटे भरले आहेत का? असा सवाल उबाठा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्राच्या सक्तीबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयावरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

संजय राऊत म्हणाले की, हे सरकार मूर्ख आहे का? आधीपासून जर त्रिभाषा सूत्र लागू होते, तर नवीन आदेश काढण्यामागे काय उद्देश आहे? हे लोक फक्त गोंधळ निर्माण करत आहेत. या सरकारच्या डोक्यात नासके बटाटे भरलेले आहेत का? गेली किमान २५ वर्ष मी संसदेमध्ये आहे. आम्हाला माहिती आहे की शासन कसे चालते.

या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आगामी संयुक्त आंदोलनाबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी मराठीसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. ही केवळ ठाकरे बंधूंच्या (Thackeray Brothers) युतीची नांदी नाही, तर मराठी एकतेची सुरुवात आहे. परंतु ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबाबत जे डोमकावळे कावकाव करत आहेत, त्यांनी गप्प बसावे. त्यांचा या विषयाशी काहीही संबंध नाही.

ते पुढे म्हणाले की, सरकार जर हिंदी सक्ती रद्द करण्याचा निर्णय घेत असेल, तर आम्ही त्याचे स्वागत करू. ही महाराष्ट्रातील जनतेची भूमिका आहे. जनतेने स्पष्टपणे सांगितले आहे की, आम्हाला ही सक्ती मान्य नाही. त्यामुळे सरकारने लोकभावना ओळखून योग्य निर्णय घ्यावा. शेवटी लोकभावना याच सरकारपुढे निर्णायक ठरते.