Vivek Lagoo | मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू (Vivek Lagoo) यांचे मुंबईत निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
विवेक लागू हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू (Reema Lagoo) यांचे पूर्वाश्रमीचे पती होते, तर प्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका मृण्मयी लागू या त्यांची कन्या आहेत.
रंगभूमीपासून ते चित्रपट-मालिकांपर्यंतचा प्रवास
विवेक लागू यांचा जन्म पुण्यात झाला होता. त्यांना सुरुवातीपासूनच लेखन आणि दिग्दर्शनाची आवड होती, याच आवडीने त्यांना मुंबईत आणले. त्यांनी आपल्या करिअरचीसुरुवात रंगभूमीपासूनकेली. अनेक गाजलेल्या नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केले होते, ज्यात ‘चल आटप लवकर’, ‘प्रकरण दुसरं’, ‘सर्वस्वी तुझीच’ यांसारख्या नाटकांचा समावेश आहे. काही नाटकांसाठी त्यांना पुरस्कारही मिळाले होते.
दिग्दर्शनाची आवड असूनही त्यांनी अभिनयातही आपला ठसा उमटवला आणि अभिनयासाठीही त्यांना पुरस्कार मिळाले.
गेल्या काही वर्षांपासून विवेक लागू यांनी माध्यमांपासून दूर राहणे पसंत केले होते, पण तरीही त्यांनी कलाविश्वात आपले स्थान टिकवून ठेवले. त्यांनी ‘व्हॉट अबाऊट सावरकर’, ‘अग्ली’, ’31 दिवस’यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तसेच, ‘चार दिवस सासूचे’, ‘हे मन बावरे’ यांसारख्या गाजलेल्या मराठी मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. ‘गोदावरीने काय केले’ मध्येही त्यांनी काम केले होते.