अबू सालेम सुटकेसाठी हायकोर्टात राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस

मुंबई – १९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अबू सालेमने आपल्या सुटकेसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.त्याच्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत राज्य व केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.या नोटिशीद्वारे २५ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत . पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होणार आहे.

अबू सालेम हा सध्या नाशिक तुरुंगात शिक्षा भोगत आहे.सालेमचे पोर्तुगालवरून प्रत्यार्पण करण्यात आले होते. तेव्हा २५ वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगवासाची शिक्षा द्यायची नाही असे ठरले होते . त्याच आदेशाचा संदर्भ देत सालेमने त्याची तुरुंगातून सुटका कधी होणार याची अधिकृत तारीख जाहीर करण्याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सालेमच्या वतीने अ‍ॅड.फरहाना शाह यांनी याचिका दाखल केली आहे.या याचिकेवर काल सुनावणी झाली.त्यावेळी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेतली. न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस बजावून २५ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.