ठाण्यात सहा महिन्यांत टोइंग व्हॅन सुरु होणार

ठाणे – ठाण्यात सहा महिन्यात पुन्हा टोइंग व्हॅन सुरू होणार आहेत. त्या अनुषंगाने वाहतूक विभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, या निर्णयाविरोधात नागरिकांबरोबरच आता राजकीय पक्षही मैदानात उतरले आहेत. ही सेवा सुरू करु नये यासाठी भाजपाने वाहतूक विभागाला निवेदन पाठवले आहे. तर शिवसेनाही (उबाठा) टोइंग व्हॅनला विरोध दर्शवत असून त्यांनी देखील काल वाहतूक विभागाला याबाबत निवेदन दिले आहे .
ठाण्यात मागील सहा महिन्यांपासून टोइंग व्हॅन बंद होत्या. परंतु त्यामुळे कुठेही वाहनांची कोंडी झालेली आढळली नाही. असे असतानाही आता वाहतूक विभागाने पुन्हा टोइंग व्हॅन सुरू करण्याचा निर्धार केला आहे. दक्ष नागरिक अजय जया यांच्यासह संगम डोंगरे यांनी आवाज उठवत वाहतूक विभागाच्या या कृतीचा निषेध केला आहे. ई-चलानची व्यवस्था सुरू असताना, मग टोइंग व्हॅनची गरज काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे, ठाणे स्थानकावरून धावणाऱ्या शेअर रिक्षामध्ये ५-५ प्रवाशांना नेले जाते, मात्र त्यांच्यावर कुठेही कारवाई होताना दिसत नाही. शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर रिक्षा स्टँड बांधले आहेत, जिथे रिक्षा चालकांची दादागिरी ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. कार डेकोर आणि इतर दुकानांच्या बाहेर बेकायदेशीर पार्किंग होत आहे, परंतु त्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही, किंवा कारवाई होतांना दिसत नाही. वाहतूक विभागाने सम-विषम पार्किंग धोरण लागू केले असतानाही त्याचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे या समस्या आधी सोडव्यात, अशी मागणी दक्ष नागरिक मृणाल पेंडसे यांनी केली आहे. एकूणच यावर तोडगा निघाला नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी या निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.