पाच महिने पगार मिळाला नाही;विट्सबाहेर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

छत्रपती संभाजीनगर – सामाजिक न्यायमंत्री मंत्री संजय शिरसाट यांच्या निविदेमुळे चर्चेत आलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलचे कर्मचारी आज आक्रमक झाले. थकीत वेतनासह इतर मागण्यांसाठी आज त्यांनी हॉटेलच्या बाहेर आंदोलन केले. गेल्या पाच महिन्यांपासून हॉटेल बंद असून कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आज आक्रोश व्यक्त केला.

हॉटेलच्या लिलावात नाव आल्यानंतर वाद झाल्याने या प्रक्रियेतून मुलगा सिद्धांत बाहेर पडत असल्याचे कालच संजय शिरसाट यांनी जाहीर केले होते. आर्थिक परिस्थितीमुळे विट्स हॉटेल पाच महिन्यांपासून बंद आहे. एका महिन्यात हॉटेल दुसऱ्या ग्रुपकडे दिले जाईल आणि पुन्हा कामावर रजू करण्यात येईल असे आश्वासन कर्मचार्‍यांना देण्यात आले होते. पण अद्याप पुन्हा कामावर घेण्यात आले नाही, असा आरोप आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला.
कर्मचारी म्हणाले की, हॉटेल अचानक बंद करण्यात आले. कोणतेही कारण दिले नाही. आमचा पगार देण्यात आलेला नाही. हॉटेल पुन्हा सुरू होईल आणि आम्हाला कामावर घेतले जाईल,असे आम्हाला सांगितले. पण तसे काही होताना दिसत नाही. आम्हाला कामावर घेतले गेले नाही तर आत्महत्या करण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा मार्ग नाही.