बंगळूरू – बंगळूरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणानंतर क्रिकेटपटू विराट कोहली आणि आरसीबीवर टीकेची झोड उठली आहे. अनेकांनी कोहलीच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याला अटक करण्याची मागणी केली आहे. समाज माध्यमांवर अरेस्ट कोहली हा हॅशटॅग ६ हजारांहून अधिक लोकांनी वापरून ट्रेंड केला आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचा विजय झाला. बंगळूरु शहरातील ३५ हजार लोकांची क्षमता असलेल्या एम. चिन्नास्वामी स्टेडीयमवर आयोजित विजयोत्सवात लाखोच्या संख्येने लोक जमले होते. त्यामुळे तिथे प्रचंड चेंगराचेंगरीची दुर्घटना झाली. या प्रकरणात आतापर्यंत बंगळुरुतील पोलीस आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर आरसीबीच्या मार्केटिंग प्रमुखालाही अटक करण्यात आली आहे. तर सामाजिक कार्यकर्ते एच एम वेंकटेश यांनी विराट कोहलीविरोधात क्यूबन पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत त्याला अटक करावी, अशी केली आहे. कोहलीने विजयोत्सवात भाग घेतला आणि स्टेडियमच्या बाहेर घडलेल्या दुर्घटनेबाबत पुरेशी संवेदनशीलता दाखवली नाही, असा आरोप करत समाज माध्यमांवरही कोहलीवर टीका होत आहे. ६ हजारहून अधिक लोकांनी अरेस्ट कोहली हा हॅशटॅगचा वापर करत कोहलीच्या अटकेची मागणी केली आहे.
एका नेटकऱ्याने अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की, विराट कोहलीने मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली का? तो लंडनला गेला. त्याने लंडनचा प्रवास का पुढे ढकलला नाही ? तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले की, दोन दिवसापूर्वी कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांना मुंबई विमानतळावर दिसले. लंडनला जाण्याची इतकी घाई का ? हे असंवेदशील आहे.
काही नेटकऱ्यांनी प्रश्न विचारले की, विराटला घटनेबाबत माहिती नव्हती का ? ट्रॉफीपेक्षा नागरिकांचे प्राण महत्त्वाचे नाहीत का? सेलिब्रेशन थांबवून शोक व्यक्त करणे गरजेचे नव्हते का?
कर्नाटक क्रिकेट असो.च्या
कोषाध्यक्ष,सचिवांचा राजीनामा
बंगळुरु येथील चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे सचिव ए. शंकर व कोषाध्यक्ष ईएस जयराम यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. आयपीएलच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीची नैतिक जबाबदारी स्विकारुन हा राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. कर्नाटक क्रिकेट असोसिएशन (केसीए) च्या अध्यक्षांकडे त्यांनी काल आपला राजीनामा सोपवला. या आधी केएससीएने न्यायालयात सांगितले होते की, प्रवेशद्वाराचे व्यवस्थापन व गर्दीचे नियोजन ही त्यांची जबाबदारी नव्हती. आरसीबीने त्यांच्याकडे हा कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी मागितली होती व त्यांनी ती दिली होती. स्टेडियममधील कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. पण बाहेर चेंगराचेंगरी झाली