नवी दिल्ली – दिल्ली एनसीआरमधील फरीदाबादमध्ये पत्नीसोबतच्या भांडणानंतर पतीने आपल्या चार मुलांसोबत रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. ही घटना दुपारी १२:५५ च्या सुमारास फरीदाबाद येथे घडली. यात या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. मनोज महतो (४५) असे मृत पतीचे नाव आहे तर चारही मुले अल्पवयीन आहेत.
मनोज हा मूळचा बिहारमधील आहे. मनोज आणि त्याची पत्नी प्रिया यांचात सतत वाद होत असत. सकाळीही त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले. यानंतर मनोज मुलांना गार्डनमध्ये घेऊन जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. मात्र तो गार्डनमध्ये न जाता रेल्वे स्थानकात गेला. मनोज रेल्वे स्थानकापासून सुमारे १ किमी अंतरावर रेल्वे रुळावर चालत होता. यावेळी त्याने दोन मुलांना खांद्यावर घेतले होते, तर इतर दोघांचे हात धरले होते. लोको पायलटने त्याला पाहून अनेकदा हॉर्न वाजवला. पण मनोज रुळावरून बाजूला झाला नाही. त्यांनतर ट्रेन जवळ येताच त्याने मुलांसह ट्रेनसमोर उडी घेतली. यात त्या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह रुळावरून बाजूले केले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.