Kailash Mansarovar Yatra resumes after six years
लखनौ- तब्बल सहा वर्षांच्या खंडानंतर कैलास मानसरोवर यात्रा(Kailash Mansarovar Yatra) पुन्हा सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशच्या (UP)बहराईचमधून ४५ यात्रेकरूंचा पहिला गट नेपालगंज मार्गे तिबेटच्या(Tibet) दिशेने निघाला. बहराईचमधील ब्लिस रिसॉर्टमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या यात्रेकरूंना आवश्यक साहित्याचे किट देऊन त्यांची समारंभपूर्वक रवानगी केली.
यात्रेकरूंच्या या पहिल्या गटात उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या अनेक जिल्ह्यांमधील व मलेशियातून उत्तर प्रदेशमध्ये यात्रेसाठी आलेल्या एका महिलेचा समावेश आहे. धार्मिक विधी आणि देवाची प्रार्थना करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
नेपालगंजहून हे यात्रेकरू विमानाने सिमिकोटला आणि तिथून हॅलिकॉप्टरने हिलसा येथे जातील. पुढे एक पादचारी पूल ओलांडून ते तिबेटमध्ये जातील. तिबेटमध्ये तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी दोन दिवस मुक्काम करून २९ जून रोजी ते मानसरोवर तलावाजवळ पोहोचतील. तीर्थक्षेत्रावर तीन दिवसांच्या मुक्कामात पूजा-पाठ, धार्मिक विधी आणि ध्यानधारणा करून यात्रेकरू माघारी फिरतील.