मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह (Mumbai) राज्यात मुसळधार पाऊस (Rain) पडत आहे. मुंबईला पाणीपुरवठा (Water supply) करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्याने सातही धरणांचा पाणीसाठा ९५. १३ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा पाणीसाठा ९४.४९ टक्के इतका होता. सध्या सात धरणांपैकी चार धरणे काठोकाठ भरल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो.या सातही धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी असून आता धरणांमध्ये १३ लाख ७६ हजार ७०३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली होती.त्यामुळे धरणांचा पाणीसाठा ८९ टक्क्यांवर स्थिरावला होता.मात्र,मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी तुळशी तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला होता.त्यानंतर, दोन दिवसांनी म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास विहार तलावही काठोकाठ भरून वाहत होता. त्यापाठोपाठ तानसा आणि मोडकसागर तलावही १०० टक्के भरला आहे.उर्वरित भातसा,मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा ही तीन धरणेही काठोकाठ भरण्याच्या मार्गावर आहेत.