एसी लोकलला प्रवाशांचा विरोध लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी

local train fare

मुंबई – सोमवार ९ जून रोजी मध्य रेल्वे मार्गावरील Mumbra -Diva स्थानकादरम्यान घडलेल्या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्या आहेत. यानंतर CM Devendra Fadnavis यांनी केंद्र सरकारकडून सर्व लोकल एसी (AC Local Trains) करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती दिली. या निर्णयाला प्रवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. प्रवाशांनी आम्हाला वातानुकूलित लोकलपेक्षा सुरक्षित आणि वेळेवर पोहोचणारी सेवा हवी, अशी मागणी केली. तर काही लोकांनी भीतीपोटी यावर बोलण्यास नकार दिला.


मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या प्रवासात वेळापत्रक बिघडणे, अचानक गाड्या रद्द होणे आणि प्रचंड गर्दी यामुळे प्रवाशांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. गाड्यांमध्ये जागेअभावी अनेक प्रवासी लोकलच्या दरवाजावर लटकून प्रवास करतात. परिणामी, अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. विशेषतः मध्य रेल्वेमार्गावर या समस्यांचा अधिक तीव्रतेने अनुभव येतो. मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, उदरनिर्वाहासाठी प्रवास अपरिहार्य असल्याने, जीव धोक्यात घालूनही लोक दररोज प्रवास करतात. एसी लोकल गाड्यांची परिस्थिती देखील काही वेगळी नाही. डोंबिवली स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ वर जलद गतीने धावणारी एसी लोकल आल्यानंतर आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती. लोकलमध्ये प्रचंड गर्दी झाल्यामुळे दरवाजे बंद होण्यात अडथळा येत होता. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना प्रवाशांना जबरदस्तीने लोकलमध्ये ढकलावे लागले. दररोज सकाळी ८.५९ वाजता धावणाऱ्या या एसी लोकलमध्ये ही परिस्थिती नेहमीच उद्भवत असल्याची माहिती एका सुरक्षा जवानाने दिली. विशेष म्हणजे, कोणतीही पूर्वसूचना न देता जलद लोकल रद्द करण्यात आली होती. परिणामी, या एसी लोकलमध्ये प्रवाशांची अधिकच गर्दी झाली. कालही अशाच प्रकारे डोंबिवली स्थानकात एसी लोकलचे दरवाजे बंद न होण्याची समस्या उद्भवली होती, यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. मुंब्रा- दिवा दरम्यान झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली आहे. ती लवकरच रेल्वे प्रशासनाकडे अहवाल सादर करणार आहे.


पश्चिम रेल्वेमार्गावरही समस्यांची मालिका थांबत नाही. माहीम स्थानकाजवळ सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने आज सकाळी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. dadar-andheri मार्गावरील फास्ट ट्रेन १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. रेल्वे प्रशासनाने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले, मात्र या अचानक कोलमडलेल्या रेल्वे सेवा व्यवस्थेमुळे हजारो प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. विरारहून चर्चगेटकडे जाणारी सकाळी ९:१५ ची लोकल १० मिनिटे बांद्रा स्थानकात थांबली होती. या विलंबामुळे प्रवाशी संतापले होते.
एका प्रवाशाने सांगितले की, रोज train उशिरा असल्यामुळे आम्हाला मनस्ताप सहन करावा लागतो. सरकारने एसी लोकल वाढवण्यापेक्षा साध्या लोकलच्या फेऱ्या वाढवल्या, तर आमच्यासाठी जास्त उपयुक्त ठरेल. आम्ही रोज विरार ते चर्चगेट असा प्रवास करतो. गाड्या वेळेवर येत नाहीत, कधी रद्दही होतात. त्यामुळे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. जर लोकल वेळेवर पोहोचली, तर आम्हाला खूप मदत होईल. तसेच सरकारने लोकलला दरवाजे लावण्याची घोषणा केली आहे, पण जर आम्हाला उघड्या दरवाजातच गुदमरून जावे लागत असेल, तर बंद दरवाजे असलेल्या लोकलमध्ये प्रवास करणे आमच्यासाठी आणखी त्रासदायक ठरेल. त्यामुळे एसी लोकल वाढवण्यापेक्षा साध्या लोकल वाढवाव्यात, हा पर्याय अधिक योग्य आहे.
दुसऱ्या प्रवाशाने सांगितले की, मंत्र्यांनी ऑफिसला जाण्याच्या वेळेत एकदा तरी लोकलने प्रवास करावा, म्हणजे त्यांना खऱ्या अडचणी कळतील. कारण बसून बोलणे सोपे आहे, पण आम्हाला रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. घरी पोहोचू की नाही याचीही खात्री नसते. त्यामुळे सरकारने एसी लोकल वाढवण्याऐवजी साध्या लोकल वाढवाव्यात.
तिसऱ्या प्रवाशाने सांगितले की, अनेक वेळा लोकल सेवा वाढवाव्या यासाठी पत्रव्यवहार केला, पण काहीही उपयोग झाला नाही. गाड्या त्यांच्या नियोजित वेळेनुसार चालत नाहीत. कुठलीही पूर्वसूचना न देता गाड्या रद्द केल्या जातात, त्यामुळे प्रचंड गर्दी होते आणि लोकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. जर सरकारने वेळेवर लोकल वाढवल्या आणि नियमित वेळेनुसार गाड्या चालवल्या, तर मुंब्रा-दिवा सारख्या दुर्घटना टाळता येतील.