देहू – संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी (Sant Tukaram Maharaj Palkhi)सोहळ्यातील रथ ओढण्याचा बहुमान यंदा निपाणी तालुक्यातील आप्पाचीवाडी येथील बाबुराव अर्जुन खोत यांच्या माणिक – राजा (Manik-Raja)या बैलजोडीला कायमस्वरूपी लाभला आहे. ही बैलजोडी खोत यांच्याकडून देहू संस्थानने पहिल्यांदाच कायमस्वरूपी खरेदी केली आहे.
बेंदूर सणाचे औचित्य साधून गावकऱ्यांनी पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून या बैलजोडीला देहू संस्थानकडे सुपूर्द केले.पांढरा शुभ्र रंग, अंगाने धिप्पाड, एकसारखा जोडा असणारी ही बैलजोडी गावची शान होती.त्यामुळे बैलजोडीला निरोप देताना खोत कुटुंबासह गावकरी भावनाविवश झाले होते.यापूर्वी या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडी ही तात्पुरत्या स्वरूपात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून घेतली जात होती.मात्र रथ ओढण्यासाठी आपल्याच बैलजोडीला मान मिळावा यासाठी चढाओढ लागत असे. त्यामुळे रथासाठी हक्काची बैलजोडी असावी या उद्देशाने देहू संस्थानने महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागात बैलजोडीची चाचपणी करताना त्यांना खोत यांची बैलजोडी पसंत आली आणि ती त्यांनी खरेदी केली.