मुंबई – ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त होईल, असा दावा करणारे भाजपा नेते आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला. महाजन हे भाजपाचे दलाल आहेत, अशी जळजळीत टीका राऊत यांनी केली.
बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्याची भाषा करणारे गिरीश महाजन भाजपाचे दलाल आहेत. त्यांच्या दहा पिढया आल्या तरी शिवसेना संपणार नाही. सध्याचा भाजपा हा सर्व राष्ट्रद्रोही लोकांना एकत्र करून बनलेला आहे. हाती सत्ता आहे, टेंडरच्या कमिशनमधून मिळणारा बख्खळ पैसा आहे. त्याचा वापर करत दुसऱ्या पक्षातील लोकांना विकत घेऊन पक्षात आणले जात आहे. या कामात महाजन दलालाची भूमिका बजावत आहेत, असे राऊत म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशात शिष्टमंडळे पाठवण्याच्या निर्णयावर राऊत यांनी पुन्हा एकदा घणाघाती टीका केली. मोदी आणि शहा यांचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे अपयशी झाले आहे. मोदी जगभर फिरले पण एकही देश आपल्या बाजुने उभा राहिला नाही. अगदी नेपाळसारख्या फार महत्व नसलेल्या देशानेही आपल्याला पाठींबा दिलेला नाही. हे मोदी-शहांच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे, अशा शब्दात राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.