भाजपाचा दरोडा टाकत आयोगाच्या मदतीने विजय नाना पटोलेंचा आरोप

नागपूर – भाजपाने दरोडा टाकत निवडणूक आयोगाच्या मदतीने महाराष्ट्र विधानसभेत विजय मिळवल्याचा आरोप काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केला. आमदार नाना पटोले म्हणाले की, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास ते मतदान ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले. यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ झाली. मतदानाचा टक्का कसा वाढला? हा मतांवर सरळ सरळ दरोडा टाकलेला आहे.

चंदिगड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतपत्रिकेत कसा घोटाळा करून भाजपाला विजयी घोषित केले होते. हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून जगाने पाहिले. वाराणसी लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर होते. नंतर यंत्रणा कामाला लागली आणि निकाल वेगळा लागला हे उघड झाले आहे. निवडणूक काळात भाजपाच्या विश्वासातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कशी जबाबदारी दिली हेही स्पष्ट आहे. भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने निवडणूक जिंकलेली आहे. लोकशाहीला हा कलंक लावून निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः निवडणूक आयोगाची बाजू मांडली. आताही फडणवीस, बावनकुळे हे निवडणूक आयोगाची बाजू मांडत आहेत. भाजपाचे नेते आयोगाचे वकील आहेत का?