मुंबई – महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर, सुषमा अंधारे आणि जयश्री शेळके या महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज राजभवनात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील महिलांवरील अत्याचार, वैष्णवी हगवणे प्रकरण, महिला आयोगाची निष्क्रियता या विषयांवर चर्चा झाली. महिला आयोगाला पूर्ण वेळ काम करू शकणारा अध्यक्ष नेमावा अशी यावेळी मागणी करण्यात आली.
या भेटीपूर्वी या शिष्टमंडळातील रोहिणी खडसे यांना सोडून इतर महिला नेत्यांना राजभवनात प्रवेश नाकारण्यात आला. याबद्दल माविआच्या महिला नेत्यांनी संताप व्यक्त केला. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे म्हणाल्या की, आम्हाला ऐनवेळी बैठकीबद्दल कळवण्यात आले, तरीही आम्ही वेळेवर पोहोचलो, पण माझ्याशिवाय इतरांना प्रवेश दिला गेला नाही. कुठेतरी पाणी मुरत आहे. नंतर काही वेळाने सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर आणि जयश्री शेळके यांना आत प्रवेश दिला. मात्र, काँग्रेसच्या संगीता तिवारी यांना प्रवेश नाकारल्यामुळे त्यांनीही नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, काँग्रेसला शिष्टमंडळातून बाजूला केले आहे. इतर पक्षांच्या दोन-तीन नेत्यांना जाण्याची परवानगी दिली जाते, पण आम्हाला नाही. आम्हाला अतिरेकी असल्यासारखे वागवले . सुषमा अंधारे आणि किशोरी पेडणेकर या दोघी एकाच पक्षाच्या आहेत आणि त्या गेल्या, पण मला विचारलेच नाही.
या भेटीनंतर सुषमा अंधारे म्हणाल्या की, रूपाली चाकणकर म्हणतात की त्यांच्यावर टीका केली की प्रसिद्धी मिळते म्हणून त्यांच्यावर टीका होते . पण चाकणकर कोण आहेत ? त्या स्मृती इराणी आहेत की रश्मिका मंदाना आहेत? की त्या कोणत्या क्षेत्रातील सुप्रिमो आहेत? राजकारण, बॉलिवूड , प्रशासनात सुप्रीम आहेत? या भेटीत चाकणकर हा विषय वैयक्तिक पातळीवरचा नव्हता, इतका छोटा विषय घेऊन राज्यपालांना भेटण्याचे काही कारणही नव्हते. आज राज्यपालांसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. राज्यपालांकडे आम्ही लाडकी बहीण योजना , ड्रग्ज, हगवणे प्रकरणाबाबत चर्चा केली. लाडकी बहीण योजनेतर्गत निधी देण्यासाठी सारथी, बार्टी, महाज्योतीच्या निधीसोबत इतर खात्याचा निधीही वळवला जातो ही बाब राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली. आम्ही आज चर्चेवेळी जे मुद्दे मांडले त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा वैष्णवी हगवणे प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होता. निलेश चव्हाण, जालिंदर सुपेकर यांची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर वैष्णवी हगवणे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात यावे अशी मागणी केली.
रोहिणी खडसे यांनी सांगितले की, महिला आयोग पक्षपातीपणाने वागत असल्याचे राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. महिला आयोगावर पूर्णवेळ व्यक्तीची नियुक्ती करावी, वैष्णवी हगवणे प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा अशी मागणी करण्यात आली. राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून राजकीय हस्तक्षेप होत असल्याचेही आम्ही राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले.