मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते समृद्धीचा शेवटचा टप्पाचे लोकार्पण

७०१ किमी महामार्ग प्रवाशांसाठी खुला

मुंबई – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या ७६ किमी लांबीच्या चौथ्या व शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यानंतर ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी पूर्णपणे खुला झाला. इगतपुरी येथील बोगद्यातील उत्तरेकडील मार्गिकेवर लोकार्पणाचा भव्य सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील अनेक मंत्री उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकाच गाडीतून समृद्धी महामार्गावरून प्रवास केला. यावेळी गाडीचे स्टिअरिंग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती होते. विशेष म्हणजे याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांची गाडी देवेंद्र फडणवीस यांनी चालवली होती.
समृद्धी महामार्ग हा भारतातील सर्वात लांब महामार्ग असून, एमएसआरडीसीने ६१ हजार कोटी रुपये खर्चून ७०१ किमी लांबीचा हा सहापदरी महामार्ग उभारला आहे. राज्यातील १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांमधून हा महामार्ग जातो. समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी दरम्यान ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. २६ मे २०२३ रोजी शिर्डी ते भरवीर दरम्यानच्या ८० किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते. ४ मार्च २०२४ रोजी भरवीर ते इगतपुरी दरम्यानच्या २५ किलोमीटर टप्प्याचे उद्घाटन तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते झाले होते.
आज इगतपुरी ते आमणे ७६ किमी टप्प्याचे लोकार्पण झाले असून, यात ३२ मुख्य पूल आणि ३१७ लहान पूल समाविष्ट आहेत. नागपूर ते मुंबई हे अंतर आता फक्त ८ तासांत पार करता येणार आहे. इगतपुरी ते कसारा हे अंतर केवळ ८ मिनिटांत पार करता येईल. या टप्प्यात ५ बोगदे असून, इगतपुरीतील बोगदा देशातील सर्वात रुंद बोगदा आहे. पादचाऱ्यांसाठी १८० ओव्हरपास उभारण्यात आले आहेत.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१४ नंतर पाहिलेले हे स्वप्न आज पूर्ण झाले. समृद्धी महामार्ग हा केवळ रस्ता नसून महाराष्ट्राच्या इकॉनॉमीचा कॉरिडॉर आहे. शेवटच्या ७६ किमी टप्प्यात ५ जुळे बोगदे आहेत. महामार्ग तयार करताना १ हजार शेततळे तयार करण्यात आली आहेत. २०० मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीची क्षमता आहे. बोगद्यातील तापमान ६० अंशांवर गेल्यावर आपोआप पाण्याची फवारणी सुरू होईल आणि तापमान ३० अंशांखाली आल्यावर ती थांबेल. या महामार्गामुळे महाराष्ट्रातील २४ जिल्हे जेएनपीटी पोर्टशी जोडले गेले आहेत. लवकरच वाढवण बंदराशीही जोडणी होईल. मराठवाड्याला पूर्णपणे बदलणारा शक्तीपीठ महामार्ग आम्ही उभारणार आहोत. समृद्धी महामार्गावरील वाहतुकीत ५ पटीने वाढ होणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की हा महामार्ग होऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. पण हा महाराष्ट्राचा गेमचेंजर प्रकल्प आहे. या महामार्गामुळे वन्यजीवांना कुठेही त्रास होणार नाही. वन्यजीवांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली आहे. ११ लाख मोठी झाडे व २२ लाख लहान झाडे लावली जाणार आहेत. हा महामार्ग कृषी, पर्यटन व उद्योग क्षेत्राला चालना देईल.मराठवाड्याला गेम चेंजर शक्तीपीठ महामार्ग हा देखील लवकर होईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या महामार्गाला अनेकांनी विरोध केला. छत्रपती संभाजीनगर येथे विरोध करण्यासाठी बैठक पण झाली होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हा महामार्ग पूर्ण झाला. हा प्रकल्प ५५ हजार कोटींपासून सुरू होऊन शेवटी ६१ हजार कोटींपर्यंत पोहोचला. हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी १२ कोटी सिमेंट बॅग, ७ लाख मेट्रिक टन स्टील, १३ कोटी घनमीटर भराव, ८ कोटी घनमीटर खोदकाम व त्यातून मिळालेल्या दगडांचा वापर करण्यात आला. फडणवीस यांनी या महामार्गाचे काम मुख्यमंत्री असताना सुरु केले होते आणि आज ते मुख्यमंत्री असताना या महामार्गाचे काम पूर्ण झाले.