मुंबई – उबाठाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)पक्षात नाराज असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे.या वेळी त्यांनी व्हॉट्सॲपवर (WhatsApp status) ठेवलेल्या स्टेटसमुळे या चर्चेला दुजोरा मिळाल्याची माहिती आहे. २४ तासात त्यांनी दोन असे मजकूर स्टेटसवर लावले की ज्यामुळे नाराजीच्या चर्चांना आणखी उधाण आले.
आमदार भास्कर जाधव यांनी स्टेटसमध्ये लिहिले की,दिव्यात तेल तो तेवत असताना टाकायचे असते. दिवा विझल्यावर टाकलेल्या तेलाला (oil)अर्थ राहत नाही. त्याच प्रमाणे एखाद्या व्यक्तीची किंमत वेळेवर केली पाहिजे. वेळ गेल्यावर किंमत करण्यात अर्थ नाही. तर दुसऱ्या स्टेटसमध्ये लिहिले की,सर्व काही असताना रिकामे वाटते. नात्यांमध्ये आज – काल दिखाऊपणा जवळचा वाटतो.यावर उबाठाचेच खासदार संजय राऊत यांनी खोचक टिपण्णी करत म्हटले की,भास्कर जाधव यांनी चांगली वाक्य स्टेटसला लावली आहेत. ते चांगले वाचक आहेत. त्यामुळे त्यांची भाषा अत्यंत वैभवशाली आहे. ते ज्येष्ठ नेते आहेत आणि आमचे सहकारी आहेत. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली पाहिजे. बाहेरून मत व्यक्त करण्यापेक्षा स्वतः येऊन बोलणे आवश्यक आहे.
भास्कर जाधव यांनी तीन दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील समर्थकांना घरी बोलावून त्यांच्याशी संवाद साधला . त्यानंतर एका पत्रकार परिषदेत त्यांनी विधान केले की, मी ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चेला काही अर्थ नाही. मी माझ्या मनातील व्यथा मांडली. त्यावर कोण काय बोलले त्यावर भाष्य करण्याची गरज मला वाटत नाही. ज्या गोष्टी माझ्या मनात नाहीत, त्यावर मी खुलासा करत नाही. मी आधी गोष्टी करतो. त्यानंतर सांगतो. पण नियतीच्या पोटात उद्या काय दडले हे कोणालाही सांगता येत नाही.
